घशात खवखव आणि सततचा खोकला; मुंबईकर खोकल्याने बेजार; बदलत्या हवामानाचा परिणाम?

| Updated on: Feb 08, 2023 | 1:29 PM

गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाला असून यामुळे मुंबईकरांना सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागला. प्रदूषणामुळेही हवेची गुणवत्ता घसरली असून त्यामुळे हा त्रास वाढत असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.

घशात खवखव आणि सततचा खोकला; मुंबईकर खोकल्याने बेजार; बदलत्या हवामानाचा परिणाम?
Image Credit source: Freepik
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाला असून यामुळे मुंबईकरांना सर्दी, खोकल्याचा (cough and cold) त्रास होऊ लागला आहे. हवामानाती बदल, आधी थंड वारे, मध्येच होणारी गरमी तसेच प्रदूषित हवा (polluted weather) , धूळ, धूर यामुळे मुंबईकर नागरिक अक्षरश: त्रासून गेले असून बहुतांश लोकांना पुन्हा खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. तापाची लक्षणे, मध्ये होणारी सर्दी आणि सतत येणाऱ्या खोकल्यामुळे घशाची लागलेली वाट या समस्यांमुळे अनेक लोक बेजार (people are feeling sick) झाले आहेत. प्रत्येक कुटुंबातील एखाद्या तरी व्यक्तीला हा त्रास होत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.

मोठी माणसेच नव्हे तर शाळकरी विद्यार्थी, लहान मुलंही सर्दी-खोकल्याने त्रासली आहेत. त्यातच आता परीक्षा जवळ आलेल्या असतानाचा मुलं आजारी पडल्याने पालकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागिरकांना न्यूमोनियाचा सामना करावा लागत आहे. सध्या दिसणाऱ्या या लक्षणांनुसार त्यावर उपचार करणे हा एकमेव पर्याय असल्याने सध्या बऱ्याच रुग्णांना उपचार, औषधे देण्यात येत असून डॉक्टरांचे दवाखाने आणि हॉस्पिटलमधील गर्दी वाढताना दिसत आहे.

मात्र अशा रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी घाबरण्याचे अथवा काळजी करण्याचे काही कारण नाही, असा दिलासा डॉक्टर देत आहेत.

हे सुद्धा वाचा

बदलत्या वातावरणामुळे होणारा खोकला हा जास्त तापदायक ठरताना दिसत आहे. या त्रासामुळे खोकून-खोकून घसा लाल होणे, तसेच मोकळा श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे दिसत आहे. वातावरणातील धूळ आणि प्रदूषण प्रचंड वाढले आहे, अशी दूषित हवा श्वासावाटे फुफ्फुसात गेली की खोकला अजूनच वाढतो.

काही लोकांना हा त्रास 2 ते 3 दिवस होतो आणि बरा होतो, मात्र काही रुग्णांमध्ये हा खोकला तब्बल आठवडाभर असल्याचे दिसून आले. फुफ्फुसांच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या या आजाराला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज’ (COPD) असे म्हटले जाते. हा फुफ्फुसांचा प्रदीर्घ आजार असून या विकारामध्ये संबंधित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. वातावरणातील धूळ, प्रदूषण, हवेची घसरलेली गुणवत्ता यामुळे लोकांचा त्रास वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मास्कचा वापर करणे नागरिकांसाठी ठरेल उत्तम

गेल्या काही काळात थोड्या-थोड्या दिवसांनी वातावरणात बदल होत असून त्यामुळे अनेकांना ॲलर्जीचा त्रास होतो. अस्थमाचे रुग्ण तर या त्रासामुळे आणखी बेजार होतात, तर काहींना नव्याने अस्थमा सुरू झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे अनेकांना घशाचा त्रास, सर्दी होणे अशी लक्षणे दिसतात. होळीपर्यंत हे असेच चालू राहील, असेही तज्ज्ञांनी नमूद केले. साध्या औषधांनी हा आजार बरा होऊ शकतो. याचा अधिक त्रास टाळण्यासाठी मास्कचा वापर करणे हे नागरिकांसाठी उत्तम ठरेल, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

परराज्यातील लोकांमुळे संसर्ग पसरण्याचा धोका

हवेची गुणवत्ता घसरत चालली असून प्रदूषण त्याला जबाबदार आहे. लोकांच्या घशाला संसर्ग झाल्याने ते दिवसभर खोकत असतात. यामुळे एक-दोन दिवस ताप येतो, पण औषधांनी बरा होतो. विशेषत: बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्या मार्फत येथे संसर्ग पसतो, असे तज्ज्ञांनी नमूद केले.