पाय खूप दुखतात म्हणून फिरवताय बर्फाची बाटली? याने खरंच आराम मिळतो का?
अनेक जण सतत पाय दुखत असल्याची तक्रार करत असतात. यावर आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय देखील करतात. अशाच उपयांपैकी एक उपाय म्हणजे पायांवर बर्फाटी बाटली फिरवणे... पण यामुळे खरंच आराम मिळतो का? घ्या जाणून...

सांगायचं झालं तर कोणतीही समस्या समोर आली तर, आपण सर्वात आधी सोशल मीडियावर त्याबद्दल सर्च करतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, पायाखाली बर्फाच्या पाण्याने भरलेली बाटली फिरवल्याने पायाचं दुखणं कमी होऊ शकतं. डॉक्टरांच्या मते, जेव्हा बर्फाची थंडी पायाला लागते, तेव्हा त्या भागातील रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकुंचन पावतात. यामुळे सूज आणि दाह कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, थंडीमुळे नसा किंचित थंड होतात, ज्यामुळे वेदना मेंदूपर्यंत कमी प्रमाणात पोहोचतात. परिणामी, तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो. पण प्रत्येकजण याचा वापर करू शकतो का आणि कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे जाणून घ्या…
ज्यांना प्लांटार फॅसिटिस किंवा पायाच्या तळव्याच्या दुखण्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठी ही पद्धत विशेषतः उपयुक्त ठरू शकते. बाटलीचा गोलाकार आकार पायाच्या स्नायूंना हळुवारपणे ताणण्यास मदत करतो. जे लोक दिवसभर उभे राहून काम करतात किंवा खूप चालतात, त्यांनाही यामुळे काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
कोणासाठी धोकादायक आहे?
ही पद्धत वापरताना काही खबरदारी घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. बर्फाची बाटली थेट त्वचेवर फिरवल्याने ‘फ्रॉस्टबाइट’ म्हणजेच त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे, मोजे घालणे किंवा बाटली एका लहान कापडात गुंडाळणे उत्तम. ही पद्धत एका वेळी 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ वापरू नये. मधुमेह, नसांची कमजोरी असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे करू नये.
एकंदरीत, बर्फाच्या पाण्याची बाटली पायांवर फिरवण ही एक सोपी पद्धत आहे, जी पायांच्या सामान्य वेदना आणि थकव्यापासून तात्पुरता आराम देऊ शकते. मात्र, जर वेदना अनेक दिवस टिकून राहिली किंवा तीव्र असेल, तर फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
सांगायचं झालं तर, आजच्या धावपळीच्या आयुष्यात आणि अनेकांचं बसल्या जागी काम असल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या डोकं वर काढतात. पण यावर व्यायव केल्यास फरक पडू शकतो. कारण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक हलचाल अत्यंत महत्त्वाची आहे.