श्रीलंकेनंतर आता ‘हा’ देश आर्थिक संकटात; अन्नधान्याचा भीषण तुटवडा , भारताकडून मदतीची अपेक्षा

श्रीलंकेनंतर आता भूतानमध्ये देखील अन्यधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

श्रीलंकेनंतर आता हा देश आर्थिक संकटात; अन्नधान्याचा भीषण तुटवडा , भारताकडून मदतीची अपेक्षा
| Updated on: May 28, 2022 | 5:30 AM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जगभरात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. भारताचा शेजारी देश असलेला श्रीलंका (Sri Lanka) मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत पेट्रोल (Petrol), डिझेलच्या किमतीने 400 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर अन्नधान्याच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की, ते खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे. त्यामुळे तेथील अनेकांवर उपासमीरीची वेळ आली आहे. दरम्यान श्रीलंकेप्रमाणेच भारताचा आणखी एक शेजारी देश असलेल्या भूतानमध्ये देखील अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भूतानच्या ग्रामीण भागातील लोकांना अन्नधान्याच्या खरेदीसाठी रांगा लवण्याची वेळ आली आहे. मात्र तरी देखील पुरेशाप्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. याबाबत भूतानचे वित्तमंत्री लोकनाथ शर्मा यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली.

अन्नधान्याची टंचाई

भूतान हा एक छोटा देश असून, त्याची लोकसंख्या आठ लाखांपेक्षाही कमी आहे. या देशाला सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. रशिया आणि युक्रेमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच खाद्य तेल आणि इतर गोष्टींचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना महामारीतून सावरत असलेल्या भूतानसमोर हे नवे संकट निर्माण झाले आहे. देशात वाढत असलेल्या महागाईमुळे भूतानच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढला आहे.

धान्यासाठी भारतावर अवलंबून

भूतानचा अशा देशांमध्ये समावेश होतो, जो आपल्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर अवलंबून आहे. भूतानने गेल्या वर्षी भारताकडून 30.35 मिलियन डॉलचे धान्य खरेदी केले होते. भूतान प्रामुख्याने भारताकडून गहू आणि तांदूळाची खरेदी करतो. भूतानची चिंता वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या भारताने गहू आणि साखरेच्या निर्यातीवर प्रतिबंध घातले आहेत. शर्मा यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता रॉयटर्सला सांगितले की, काही देशांनी निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे देशात अन्नधान्याचा तुटवडा जाणवू शकतो, याची भूतान सरकारला काळजी वाटत आहे. मात्र दुसरीकडे शेजारील देशांना धान्याची निर्यात सुरूच ठेवणार असल्याचे भारताने म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us