भारता शेजारच्या देशात मोठी उलथापालथ! 26 दिवसातच धाडकन राजीनामा, नेमकं काय घडलं?

भारताच्या शेजारी असलेल्या देशामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. सरकार स्थापन होऊन अवघे 26 दिवस झाले नाही तर बड्या नेत्याने थेट राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या देशात स्थापन झालेल्या सरकारपुढे मोठे आवाहन तयार झाले आहे.

भारता शेजारच्या देशात मोठी उलथापालथ! 26 दिवसातच धाडकन राजीनामा, नेमकं काय घडलं?
Parliament
Image Credit source: ANI
| Updated on: Apr 22, 2026 | 4:42 PM

नेपाळचे गृहमंत्री सुधन गुरुंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २६ दिवसांच्या आतच राजीनामा दिला आहे. बुधवारी (२२ एप्रिल २०२६) त्यांच्या आर्थिक मालमत्तेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या शंकांची निष्पक्ष चौकशी व्हावी, असे कारण देत त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुधन गुरुंग यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

सुधन गुरुंग यांच्यावर वादग्रस्त व्यावसायिक दीपक भट्टा यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी आणि मायक्रो इन्शुरन्स कंपन्यांमध्ये संशयास्पद गुंतवणूक केल्याचे आरोप झाले होते. दीपक भट्टा यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप असून त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे.

सुधन गुरुंग यांनी गृहमंत्री झाल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता, मात्र आता त्यांना स्वतःच्या वैयक्तिक गुंतवणुकीमुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. व्यापक विरोधानंतर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक पोस्टमध्ये सुधन गुरुंग यांनी लिहिले की, ‘माझ्याशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी आणि पदावर असताना हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी तसेच चौकशी प्रक्रियेवर कोणताही प्रभाव पडू नये. यासाठी मी गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.’

सुधन गुरुंग म्हणाले, ‘माझ्यासाठी नैतिकता ही पदापेक्षा मोठी आहे आणि जनतेच्या विश्वासापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. नेपाळमध्ये सुरू असलेल्या ‘Gen Z’ आंदोलनाने, जे सुशासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करत आहे, त्यांनीही हाच संदेश दिला आहे की सार्वजनिक जीवन स्वच्छ असावे आणि नेतृत्व जबाबदार असावे. जर कोणी माझ्या ४६ बंधू-भगिनींच्या रक्ताने आणि बलिदानाने स्थापन झालेल्या सरकारवर प्रश्न उपस्थित करत असेल, तर त्याचे उत्तर नैतिकता हेच आहे.’ त्यांनी असेही म्हटले आहे की, ते त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करतील.

सुधन गुरुंग यांनी आवाहन केले आहे की, अनेक अफवा पसरल्या आहेत, त्यामुळे तर्कवितर्क करू नका. ते म्हणाले, ‘आरोप आणि सत्य एकच नसतात. पुराव्यांच्या आधारावर निर्णय झाला पाहिजे, भावनांच्या आधारावर नाही. मी पक्षाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करेन आणि चौकशीत पूर्ण सहकार्य करेन.’

Follow Us