
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेचे अनेक वर्षांचे चांगले संबंध ताणले आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता धमक्या देखील दिल्या जात आहेत. अमेरिकेला काहीही करून रशियाला कोंडीत पकडायचे आहे. याकरिता भारताला त्रास दिला जात आहे. अमेरिकेने स्पष्ट म्हटले की, भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद करावे, आम्ही त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ लगेचच काढू. अमेरिका अनेक प्रकारे भारतावर दबाब टाकण्याचे काम करत असताना भारत हा अमेरिकेच्या धमक्यांना अजिबात भीक घालत नाहीये. भारताला अडकवण्यासाठी टॅरिफनंतर H-1B व्हिसामध्येही मोठा बदल अमेरिकेने केला. भारतीय नागरिक हे मोठ्या प्रमाणात अमेरिकेत H-1B व्हिसावर जाऊन नोकऱ्या करतात. आता H-1B व्हिसासाठी तब्बल 88 लाख रूपये मोजावी लागणार आहेत.
अमेरिकेचे गेल्या काही काळापासून भारताशी मतभेद असले तरी पाकिस्तानसोबतची जवळीकता वाढली आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेची वाढलेली जवळीकता पाहून जगाला धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाना अमेरिकेच्या भूमीवरून भारताला थेट परमाणू हल्ल्याची धमकी दिली. हे इतिहासामध्येच पहिलयांदाच घडले की, अमेरिकेतून एखाद्या दुसऱ्या देशाने परमाणू हल्ल्याची धमकी दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांची पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक असल्याचेही सांगितले जाते. आता मागील काही दिवसांच्या जवळीकतेनंतर अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका अधिकाऱ्याने नुकताच सांगितले की, भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्याचा किंवा काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचा कोणताही हेतू अजिबात नाही.
अमेरिकन अधिकाऱ्याच्या मते, काश्मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तानमधील परस्पर बाब आहे. दोन्ही देशांनी जर या मुद्द्यामध्ये मदत मागितली तर आम्ही मध्यस्थी करू. मात्र, भारताने प्रत्येकवेळ स्पष्ट केले की, काश्मीर प्रश्नात बाहेरील हस्तक्षेप अजिबात सहन करणार नाही. अमेरिका तसे करण्याचा प्रयत्न करणार नाही, असेही अमेरिकेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यामुळे हा नक्कीच मोठा धक्का पाकिस्तानला म्हणावा लागणार आहे.