Imran Khan : सरकार पाडण्यासाठी विरोधकांचं षडयंत्र, इम्रान खान यांचा आरोप; खान यांच्या भाषणातील 10 मुद्दे

| Updated on: Mar 27, 2022 | 11:21 PM

इम्रान खान यांनी रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक पहिल्या दिवसापासून आपल्या विरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय.

Imran Khan : सरकार पाडण्यासाठी विरोधकांचं षडयंत्र, इम्रान खान यांचा आरोप; खान यांच्या भाषणातील 10 मुद्दे
इम्रान खान, पंतप्रधान, पाकिस्तान
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये सध्या इम्रान खान (Imran Khan) सरकार धोक्यात आहे. विरोधकांनी इम्रान खान सरकारवर अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणलाय. अशावेळी इम्रान खान यांनी रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. रविवारी संध्याकाळी राजधानी इस्लामाबादेतील (Islamabad) परेड ग्राऊंडवर मोठ्या सभेला संबोधित केलं. आपल्याला लोकांचा किती पाठिंबा आहे या शक्तिप्रदर्शनामागील खान यांचा उद्देश असल्याचं यावरुन लक्षात येत होतं. खान यांच्या या रॅलीत त्यांचे समर्थक आणि पाकिस्तानी नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना खान यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक पहिल्या दिवसापासून आपल्या विरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय.

‘परराष्ट्र धोरणाला बाहेरील ताकद नियंत्रित करतेय’

पाकिस्तानातील सध्यस्थितीचं खापर खान यांनी विरोधकांवर फोडलं. विरोधकांच्या धोरणांमुळेच पाकिस्तान इतका मागे पडलाय. माजी पंतप्रधानांनी जनतेसाठी काहीही केलं नाही. उलट त्यांनी देशाची लूटच केली. त्या भ्रष्ट नेत्यांना माफी दिली गेली त्यामुळे देशाचं मोठं नुकसान झालं, अशा शब्दात खान यांनी विरोधकांवर निशाणा साधला. इतकंच नाही तर आपल्या सरकारचं कौतुक करताना खान म्हणाले की, कोरोना काळात संपूर्ण लॉकडाऊन न केल्यानं आपल्यावर टीका होत होती. मात्र, आपल्या धोरणांमुळे कोरोना सहज आटोक्यात आला आणि लोकांना त्रास सहन करावा लागला नाही. आपल्या परराष्ट्र धोरणाला बाहेरील ताकद नियंत्रित करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. इम्रान खान यांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे आपण पाहूया…

  1. ज्या दृष्टीकोनातून पाकिस्तानची निर्मिती झाली, त्याचं अनुसरण करता यावं यासाठी मी राजकारणात आलो, असा दावा इम्रान खान यांनी केला. कल्याणकारी राज्याचे तत्व पाकिस्तानात कधीच पाळले गेले नाही, असंही ते म्हणाले.
  2. मी कल्याणकारी देश म्हणून पाकिस्तानचं व्हिजन मांडलं. त्या मार्गावर आम्ही पावलं टाकली आहेत. मला अभिमान आहे की आम्ही देशात निरोगीपणाच्या तत्वांवर आधारित आरोग्य व्यवस्था सुरु केली आहे. आता सर्वसामान्यांनाही बँकेकडून कर्ज मिळत आहे.
  3. विरोधक गेल्या 30 वर्षांपासून राष्ट्रीय सलोखा अध्यादेश (NRO) वापरुन एकमेकांना संरक्षण देत आहेत. विरोधक पहिल्या दिवसापासून माझे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यामुळे हे भ्रष्ट नेते एनआरओच्या माध्यमातून आपल्या चुका लपवत गेले.
  4. जनरल परवेझ मुशर्रफ यांनी आपलं सरकार वाचवण्यासाठी भ्रष्ट नेत्यांना एनआरओ देऊन देशात अशांतता निर्माण केली. माझं सरकार पडलं किंवा माझा जीव गेला तरी मी त्यांना माफ करणार नाही. एनआरओ एक असा अध्यादेश आहे ज्यामुळे नेते आणि अधिकाऱ्यांना कर्जमाफी दिली जाते.
  5. विदेशातील पैशातून पाकिस्तानमध्ये सरकार बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्या लोकांचा वापर केला जातोय. कदाचित नकळतपणे पण काही लोक आपल्या विरोधात पैसा वापरत आहेत. आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न कुठून केला जातोय हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला लेखी धमक्या दिल्या गेल्या. पण आम्ही राष्ट्रहिताशी तडजोड करणार नाही.
  6. सरकार पाडण्याचा कट रचणाऱ्या लोकांबाबतचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केलाय. माझ्याकडे एक पत्र आहे, जो पुरावा आहे. ज्यांना पत्राबद्दल शंका आहे त्यांनी मी ऑफ द रेकॉर्ड सांगतो. असं किती दिवस जगायचं हे आपण ठरवायचं आहे. आम्हाला धमक्या येत आहेत. परकीय कटाबद्दल अनेक गोष्टी आहेत ज्या लवकरच शेअर केल्या जातील.
  7. मागील नेत्यांच्या कृत्यांमुळे देशाला सतत धमक्या मिळायच्या. आपल्याच लोकांच्या मदतीनं देशातील सरकारं बदलली. माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी देशासाठी स्वतंत्र आर्थिक धोरण आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मौलाना फजलुर रहमान आणि फरार नवाझ शरीफ यांनी भुट्टोविरोधात मोहीम सुरु केली. भुट्टो यांच्या कारस्थानांमुळे त्यांना फाशी देण्यात आली.
  8. इम्रान खान यांनी यावेळी पाकिस्तानी लष्करावरही जोरदार हल्ला चढवला. आमचे परराष्ट्र धोरण बाहेरुन हाताळलं जात आहे. पाकिस्तानच्या प्रकरणात परकीय हात असल्याचा पुरावा सरकारकडे असल्याचंही इम्रान खान म्हणाले. मात्र, त्याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नाही.
  9. व्हाईट कॉलर गुन्हेगारांमुळे पाकिस्तान गरीब आहे. गेल्या 30 वर्षांपासून तीन उंदरांनी देशाला लुटलं, असा घणाघात इम्रान खान यांनी यावेळी केलाय.
  10. आपल्या कार्यकाळातील पीपीपीच्या भ्रष्टाचारामुळे पाकिस्तानला चर्चेनंतर तुर्कस्तानला 200 अब्ज रुपयांचा दंड भरावा लागला. अशाप्रकारे आम्ही देशाला कर्जमुक्त करण्यात मदत केल्याचा दावाही इम्रान खान यांनी केलाय.

इतर बातम्या : 

‘काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार’, नाना पटोलेंचं सुजय विखे पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

‘भाजपच्या सत्तेच्या काळातच काश्मिरी पंडितांचं विस्थापन’, पवारांचं वक्तव्य; विद्वेषाचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप

सांगलीत गोपीचंद पडळकरांनी डिजीटल गनिमी कावा नेमका कसा साधला? पाहा Video