India maldive row : डेडलाईन आधीच भारतीय कर्मचारी मालदीवमध्ये दाखल, चीनला मोठा झटका

| Updated on: Feb 29, 2024 | 2:17 PM

India maldive row : भारतीय सैन्याला माघारी बोलवण्यासाठी मालदीवकडून डेडलाईन देण्यात आली होती. चीनकडून मालदीवच्या भारताविरोधात वापर केला जात आहे. मालदीवमध्ये चीन समर्थक सत्तेत आल्याने ते भारतविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे भारताने चीनची ही चाल आधीच ओळखली आहे.

India maldive row : डेडलाईन आधीच भारतीय कर्मचारी मालदीवमध्ये दाखल, चीनला मोठा झटका
Follow us on

India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यात तणाव कायम असतानाच भारतीय तांत्रिक गोष्टी हाताळणारं पथक मालदीवमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे आता लष्करी कर्मचाऱ्यांची जागा हे भारतीय नागरिकांचं पथक घेणार आहे. भारतात परतण्याआधी मालदीवरकडून १० मार्चची डेडलाईन देण्यात आली होती. त्यामुळे भारतीय तांत्रिक पथक आधीच मालदीवमध्ये दाखल झाले आहे. ते आता विमानचालन प्लॅटफॉर्मचे कामकाज हाती घेणार आहेत. मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, भारतीय नागरिकांची पहिली टीम मालदीवमध्ये पोहोचली असून ते आता अड्डू येथील हेलिकॉप्टरचे ऑपरेशन सांभाळणार आहेत. दोन्ही देशांच्या सरकारांच्या संमतीने अड्डूमध्ये तैनात असलेले भारतीय लष्करी कर्मचारी १० मार्चपर्यंत भारतात परततील.

मालदीवमध्ये पोहोचली भारतीय तुकडी

10 मार्चपर्यंत मालदीवमधून लष्करी कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी भारतात येण्यापूर्वी भारतीय तांत्रिक कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी मालदीवमध्ये पोहोचली आहे. मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “भारतीय नागरिकांची पहिली टीम आली आहे. ते आता अड्डूमध्ये हेलिकॉप्टर ऑपरेशन चालवतील. अड्डूमध्ये तैनात असलेले भारतीय लष्करी कर्मचारी 10 मार्चपर्यंत दोन्ही देशांच्या सरकारांच्या संमतीने भारतात परततील. त्यानंतर नागरी संघ त्याचे ऑपरेशन्स ताब्यात घेण्यासाठी सराव सुरू करेल, असे निवेदनात म्हटले आहे.

दोन्ही देशांमध्ये झाली होती सहमती

2 फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली होती. ज्यामध्ये मार्च ते मे दरम्यान भारत आपले सैन्य मालदीवमधून मागे घेईल असे ठरले होते. ८ फेब्रुवारी रोजी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, सध्याच्या लष्करी कर्मचाऱ्यांच्या जागी भारतीय तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. ते मालदीवमध्ये दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान हाताळण्याचे काम करतील.

मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारतीय सैन्याला माघारी बोलवण्याचे आवाहन केले होते. दोन्ही देशांमधील तणाव कायम असताना हे आवाहन करण्यात आले होते. दुसरीकडे भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मालदीवचे मोठे नुकसान होत आहे. कारण मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे.

मालदीवमध्ये जवळपास ८० भारतीय सैनिक आहेत जे मालदीवमध्ये विमान आणि हेलिकॉप्टर हाताळण्याचे काम करतात. पण मुईज्जू यांनी याच मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. परकीय सैन्य आपल्या भूमिवर मान्य नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

मुईज्जू हे चीन समर्थक मानले जातात. त्यामुळे ते भारत विरोधी भूमिका घेत आहेत. चीनला देखील हेच हवे आहे. मात्र चीनची ही चाल भारताला माहित आहे. त्यामुळे लष्करी सैन्याच्या जागी दुसरे भारतीय नागरिक तेथे तैनात करण्यासाठी मालदीवने परवानगी दिल्याने चीनला मोठा झटका लागला आहे.