होर्मुझमध्ये दोन महाकाय जहाजांसोबत भयंकर घडलं, क्षणात घेतला…इस्लामाबाद बैठकीनंतर पुन्हा युद्धाचे काळे ढग!

पाकिस्तानमधील इराण आणि अमेरिका यांच्यातील बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीच्या अपयशामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होणारी व्यापार वाहतूक आता संकटात सापडली आहे. असे असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे.

होर्मुझमध्ये दोन महाकाय जहाजांसोबत भयंकर घडलं, क्षणात घेतला...इस्लामाबाद बैठकीनंतर पुन्हा युद्धाचे काळे ढग!
strait of hormuz
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2026 | 10:09 PM

Strait Of Hormuz : अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये बैठक झाली. या बैठकीत युद्ध कायमचे संपवण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांनी एकमेकांपुढे आपापल्या अटी ठेवल्या. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. कोणत्याही ठोस निर्णयाविनाच ही बैठक पार पडली. त्यामुळे युद्ध पुन्हा सुरू होणार का? असा भीती वाढवणारा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे युद्ध भडकण्याची शंका खरी ठरते की काय, असे वाटावे अशी एक घटना समोर आली आहे. ही घटना इराणचे वर्चस्व असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत घडली असून यामुळे संपूर्ण जगात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी जगाला चकित करणारा एक प्रकार समोर आला आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांत 14 दिवसांची शस्त्रसंधी झालेली आहे. तरीदेखील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दोन मोठ्या तेलवाहू जहाजांना यू टर्न घ्यावा लागला आहे. शिप ट्रॅकिंग डेटाच्या माहितीनुसार दोन मोठे रिकामे तेलवाहू जहाजे ओमानच्या आखातातून होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जात होते. ही सर्व जहाजे पर्शियनच्या आखातात प्रवेश करणार होते. या सर्व जहाजांना इराणकडून प्रवेशास परवानगी मिळाली होती. परंतु लारक बेटाजवळ पोहोचताच सगळं बदलून गेलं.

ऐनवेळी जहाजांनी घेतला यू टर्न

या दोन्ही जहाजांना ऐनवेळी यू टर्न घेऊन परतावं लागलं आहे. यातील एका जहाजाचे नाव एगियोस फानुरियोस-1 असे आहे. तर दुसरे जहाज हे पाकिस्तानचे असून त्याचे नाव शालीमार असे आहे. या दोन्ही जहाजांनी ऐनवेळी रस्ता बदलून यू टर्न घेतला. एगियोस फानुरियोस-1 हे जहाज इराकचे आहे.

जहाजे माघारी फिरण्याचे कारण काय?

दरम्यान, या जहाजांनी लगेच यू टर्न का घेतला याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु अमेरिका आणि इराण यांच्यातील इस्लामाबादची बैठक अयशस्वी झाल्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या व्यापारावर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. याच कारणामुळे ही दोन्ही जहाजे परत फिरली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Follow Us