
Priyanka Gandhi : सध्या गाझा पट्टीत इस्रालय आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध चालू आहे. आतापर्यंत या युद्धात हजारो लोकांचा जीव गेला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या इस्रायल-हमास यांच्यातील युद्धावर काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार प्रियांका गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेवर मोठे वादंग निर्माण झाले आहे. प्रियांका गांधींच्या या भूमिकेवर इस्रायलनेही नापसंती व्यक्त केली असून खडे बोल सुनावले आहेत. विशेष म्हणजे हमासकडून सांगितल्या जाणाऱ्या आकडेवारीवर विश्वास ठेवू नये असा सल्लाही इस्रायलने दिला आहे.
प्रियांका गांधी यांनी इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष आणि गाझा पट्टीत चालू असलेल्या युद्धावर ट्वीटच्या माध्यमातून भारत सरकारवर सडकून टीका केली आहे. भारताने या संघर्षाबाबत भूमिका घ्यायला हवी, असंही यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या. त्यांच्या याच भूमिकेची दखल इस्रायलचे भारतातील राजदूत रेवूएन अजार यांनी घेतली आहे. प्रियांका गांधी यांनी केलेल्या आरोपांचे त्यांनी उत्तर दिले आहे.
‘तुमची ही भूमिका चुकीची आहे. इस्रायलाने हमासच्या 25 हजार दहशतवाद्यांना संपवलेलं आहे. हमासकडून केल्या जाणाऱ्या घाणेरड्या राजकारणाचाच हा परिणाम आहे. हमासचे दहशतवादी नागरिकांच्या आड लपून राहतात. गाझात जे लोक मदत घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना हमासकडून लक्ष्य केलं जातं. क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून त्यांच्याकडून हल्ला केला जातो’, असं स्पष्टीकरण रेवूएन यांनी दिलं.
तसेच, आतापर्यंत इस्रायलने गाझा पट्टीत साधारण 20 लाख टन खाद्य तसेच इतर सामान पोहोचवले आहे. पण हमासकडून हे खाद्य हडपण्याचा प्रयत्न केला जातो. गाझा पट्टीत कोणताही नरसंहार होत नाहीये, असं अजार यांनी स्पष्ट केलंय. तसेच हमासने दिलेल्या आकड्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनदेखील त्यांनी प्रियांका गांधी यांना केले आहे.
What is shameful is your deceit. Israel Killed 25,000 Hamas terrorists. The terrible cost in human lives derives from Hamas’s heinous tactics of hiding behind civilians, their shooting of people trying to evacuate or receive assistance and their rocket fire. Israel facilitated 2… https://t.co/e3lSUwfmXH
— 🇮🇱 Reuven Azar (@ReuvenAzar) August 12, 2025
प्रियांका गांधी यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावरून मोदी सरकारवर टीका केली. इस्रायलकडून नरसंहार केला जातोय. आतापर्यंत 60 हजारपेक्षा जास्त लोकांना मारण्यात आलंय. यात 18430 लहान मुलं होती. तिथं शेकडो लोक अन्नावाचून मरत आहेत. या गुन्ह्यांबाबत गप्प राहणं हादेखील एक गुन्हाच आहे. भारत सरकार यावर गप्प असून ती शरमेची बाब आहे, असं प्रियांका गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या. त्यांच्या याच भूमिकेनंतर इस्रायली राजदुतांनी नाराजी व्यक्त करत प्रियांका गांधी यांचे सर्व दावे खोडून काढले आहेत.