पाकिस्तानवर जगातलं सर्वात मोठं संकट, आज रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन; हतबल सरकारची घोषणा

मध्यपूर्वेतील युद्ध आणि जागतिक इंधन दरवाढीमुळे पाकिस्तानमध्ये गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानी सरकारने ऊर्जा संकटावर उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत.

पाकिस्तानवर जगातलं सर्वात मोठं संकट, आज रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन; हतबल सरकारची घोषणा
पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ
| Updated on: Apr 07, 2026 | 1:00 PM

मध्यपूर्वेतील युद्धाचे जगाला बसत असून अनेक देशांत उर्जा संकट निर्माण झालंय. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक रोखल्यापासून, दक्षिण आशियाई आणि युरोपीय देशांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. भारत, नेपाळ आणि बांगलादेशसारख्या देशांनी हे संकट कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मात्र पाकिस्तानला या संकटातून सुटका करून घेता आलेली नाही, त्यामुळे त्यांनी स्मार्ट लॉकडाउन’ लागू केलं आहे.

देशव्यापी ऊर्जा संकटावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 7 एप्रिल म्हणजेच आजपासून बहुतांश भागांतील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि दुकाने रात्री 8 वाजल्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक स्तरावर इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होत आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ही घोषणा केली.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या पेट्रोलियम उत्पादनांसंबंधीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्देशानुसार, पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, इस्लामाबाद, गिलगिट-बाल्टिस्तान आणि आझाद जम्मू आणि काश्मीरमधील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची दुकानं ही रात्री ८ वाजता बंद होतील. मात्र असं असलं तरीही खैबर पख्तुनख्वामधील काही प्रमुख शहरांमधील बाजारपेठांना रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल-रेस्टॉरंट्स, लग्नांवरही होणार परिणाम

सरकारच्या निर्देशांनुसार, बेकरी, रेस्टॉरंट्स, तंदूर, फूड आऊटलेट्स आणि लग्नसमारंभासाठीचे हॉले हे रात्री 10 पर्यंत बद झाले पाहिजेत. तर घरी होणारे खाजगी विवाह सोहळे देखील या कालावधीत आटोपून संपले पाहिजेत, अशी सूचना देण्यात आली आहे. मेडिकल स्टोअर्स आणि फार्मसीला या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न

दिलासा देण्यासाठी म्हणून सरकारने गिलगिट आणि मुझफ्फराबादमध्ये एक महिन्यासाठी मोफत आंतरशहरी सार्वजनिक वाहतूक जाहीर केली आहे. मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्यामुळे वाढणाऱ्या जागतिक तेल आणि ऊर्जा किमतींचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सरकार प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे उपाय योजण्यात आले आहेत. यापूर्वी, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानच्या प्रांतीय सरकारांनी देखील अशाच ऊर्जा-बचत उपक्रमांचा भाग म्हणून बाजारपेठा, रेस्टॉरंट आणि विवाह सभागृह लवकर बंद करण्याचे निर्देश जारी केले होते.

युद्धामुळे आखाती प्रदेशात वाढला तणाव

मध्य पूर्वेतील सततचा तणाव हेच ऊर्जा संकटाचे मुख्य कारण आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने, इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर सुरू झालेल्या या संघर्षामुळे आखाती प्रदेशातील तणाव वाढला आहे. प्रत्युत्तर म्हणून, इराणने अमेरिकेच्या तळांना लक्ष्य केलं तसंच महत्त्वाचा जागतिक ऊर्जा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सागरी वाहतुकीच्या मार्गात अडथळा आणला, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

इंधनाच्या दरात मोठी वाढ

या संकटामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली. 6 मार्च रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 55 रुपयांनी वाढ केली. त्यानंतर, लगेचच महिन्याभराने 2 एप्रिल रोजी पेट्रोलचा दर वाढला आणि प्रति लिटरसाठी 458.41 रुपये आणि डिझेलसाठी प्रति लीटर 520.35 मोजावे लागत आहेत. मात्र नंतर सरकारने पेट्रोलचा दर प्रति लिटर 378 रुपयांपर्यंत कमी करून तात्पुरता दिलासा दिला.

Follow Us