Nepal Flood: नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 626 जणांचा मृत्यू, 1924 बेपत्ता, 320 भारतीयांचा पत्ता नाही

Nepal Flash Flood: नेपाळवर निसर्ग कोपला आहे. तिबेट पठारावरील हिमनद्या आणि हिम तलाव हे पाण्याचे बॉम्ब ठरले. त्यांनी उत्तर नेपाळला बेचिराख करून सोडले. पाच ते सहा जिल्ह्यांमधील अनेक गावं, शहरांना मोठा फटका बसला. हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 626 जणांनी प्राण गमावला आहे.

Nepal Flood: नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 626 जणांचा मृत्यू, 1924 बेपत्ता, 320 भारतीयांचा पत्ता नाही
नेपाळ महापूर
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 29, 2026 | 9:53 AM

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूराने हाहाकार माजवला. या नैसर्गिक संकटाने आतापर्यंत 626 जणांना प्राण गमवावे लागले. तर जवळपास 1924 बेपत्ता आहेत. या नैसर्गिक आपत्तीत अनेक भारतीय नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. जवळपास 320 भारतीयांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. ते आता कुठे आहेत, ते सुरक्षित आहेत का? यासाठी शोध मोहिम आणि बचाव कार्य हाती घेण्यात येत आहे. तिबेटमधील जवळपास 400 भारतीयांशी संपर्क झाला आहे. ते सुरक्षित आहेत. डोंगराळ भागात बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान भोटेकाशी आणि त्रिशुला नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढत आहे. यामुळे महापूराचा धोका वाढला आहे. शनिवारी सकाळी 6:30 वाजता भोटेकाशी आणि त्रिशूली नदीतील जलस्तर सामान्य आहे. पण तिबेटमध्ये पुन्हा एक तलाव फुटण्याची भीती व्यक्त होत असल्याने प्रशासनाने लोकांना अलर्ट जारी केला आहे.

हिमकडा, ढिगाऱ्यामुळे नैसर्गिक संकट

तिबेटमधील भागात या संकटाला सुरुवात झाली. प्राथमिक तपासानुसार, एक मोठी हिमकडा तुटला. त्यानंतर डोंगराचा काही भाग घसरला. हा सर्व ढिगारा लेंडे नदीत पडला. यामुळे पाण्याचा प्रवाह काही काळ थांबला. एक मोठा नैसर्गिक अवरोध तयार झाला. पाण्याचा दबाव वाढताच कोंडी फुटली. नदीपात्रात महापूर आला. त्यात दगडधोंडे, माती आणि इतर कचरा जोराने वाहत खालच्या दिशेने आला. हा पाण्याचा लोंढा इतक्या जोराचा होता की घरं, पूल, रस्ते काडी कचऱ्यासारखे वाहत गेले. भोटेकाशी आणि त्रिशूली नदीच्या जवळपासच्या परिसरात या महापूराने धुमाकूळ घातला.

या महापूरानंतर आता बेपत्ता लोकांचा शोध घेणे ही मोठे आवाहन आहे. डोंगराळ भागातील अनेक रस्ते, पूल वाहून गेले आहेत. यामुळे प्रभावित परिसरात पोहचण्यासाठी बचाव आणि शोध पथकाला अडचणी येत आहे. नेपाळमधील रेड क्रॉसच्या माहितीनुसार, या संकटात 90 हजाराहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. जलविद्युत प्रकल्प या महापूरात उद्धवस्त झाले आहेत. 13 हायड्रोपॉवर प्रकल्पाशी संबंधित जवळपास 933 कर्मचारी बेपत्ता आहेत. यामधील 254 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अनेक कर्मचारी अद्याप बोगद्यात अडकल्याची भीत व्यक्त होत आहे. अप्पर त्रिशुली-1 या प्रकल्पातील 576 कर्मचाऱ्यांशी संपर्क झाला नसल्याची माहिती समोर येत आहे.

400 भारतीयांशी संपर्क नाही

नेपाळमध्ये अनेक भारतीय पर्यटन, कैलास मानसरोवर यात्रा आणि इतर धार्मिक स्थळी पोहचले होते. या संकटादरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक मोठी माहिती दिली आहे. त्यानुसार, 320 भारतीय आणि 100 भारतीय वंशीय लोकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यातील 100 जण हे त्रिशुली जलविद्युत प्रकल्पात अडकलेले आहेत. तर तिबेट परिसरातील 400 भारतीयांसोबत संपर्क झालेला आहे. ते सुरक्षित असल्याचे समजते. तर चीन-नेपाळ सीमेवर अडकलेले 96 भारतीय नेपाळमध्ये पोहचले आहेत. भारताने नेपाळला पाठवलेली मदत काठमांडूत पोहचली आहे.

Follow Us