Nepal Flood : कैलास-मानसरोवर यात्रेला गेले अन् संपर्क तुटला; अभिषेक घोणेंच्या कुटुंबीयांची चिंता वाढली; AI कडून ‘सेफ झोन’चा संकेत, पण..
नेपाळमधील भीषण महापुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले कल्याणचे अभिषेक घोणे बेपत्ता झाले आहेत. संपर्काचा अभाव आणि प्रशासनाकडून अपेक्षित मदतीअभावी कुटुंबीय चिंतेत आहेत. एआयच्या मदतीने शोध घेतल्यावर ते सुरक्षित क्षेत्रात असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, त्यांना तातडीने शोधण्यासाठी ठोस उपायांची मागणी होत आहे.

सुनील जाधव, प्रतिनिधी : नेपाळमधील महाप्रलयाच्या (Nepal Flood) बातम्यांनी आणि भीषण दृश्यांनी जगभरात खळबळ माजली आहे. नेपाळमध्ये आलेलया महापुरामुळे संपूर्ण देशात बिकट परिस्थिती असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. शेकडो नागरिकांनी आत्तापर्यंत आपला जीव गमावला असून कित्येक नागरिक बेपत्ता आहेत. त्यामध्ये भारतातीलही अनेकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या नेपाळच्या अनेक भागात पर्यटक अडकल्याचे समोर येत आहे. पूर, रस्ते या पाण्याच्या तांडवामुळे नेपाळच्या अनेक भागांचा संपर्कही तुटल्याची माहिती समोर आली. दरम्यान नेपाळमध्ये महापुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचा फटका कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या भारतीय यात्रेकरूंनाही बसला आहे. महाराष्ट्रातील अनेक यात्रेकरू नेपाळमध्ये असल्याचे वृत्त असून कल्याणमधील अभिषेक घोणे या व्यक्तीचाही त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटल्याने घरातल्यांची चिंता वाढली आहे. अभिषेक यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून, AIच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ते ‘सेफ झोन’मध्ये असल्याचे समोर आल्याने कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित ती ठोस मदत मिळत नसल्याचे सांगत कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली.
‘यात्रा डॉट कॉम’मध्ये काम, मानसरोवरला जाण्याची होती इच्छा
कल्याणमधील ठाणकर पाडा परिसरात राहणारे अभिषेक घोणे हे कैलास-मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमार्गे रवाना झाले होते. अभिषेक स्वतः ‘यात्रा डॉट कॉम’मध्ये कार्यरत असून, कैलास-मानसरोवरला जाण्याची त्यांची अनेक दिवसांपासून इच्छा होती. अखेर 24 ऑगस्ट रोजी त्यांनी कल्याणमधून काठमांडूच्या दिशेने त्यांनी प्रयाण केलं आणि त्यानंतर कैलास-मानसरोवर यात्रेला सुरुवात केली.
बुद्ध गेस्ट हाऊसमधून निघाल्यानंतर संपर्क तुटला
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक यांनी प्रवासादरम्यान बुद्ध गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला होता. तेथून ते पहाटे साडेपाचच्या सुमारास पुढील प्रवासासाठी निघाले. त्यावेळी त्यांचा वडिलांशी शेवटचा संपर्क झाला. या संवादादरम्यान अभिषेक यांनी आपल्या सोबत सुमारे 90 पर्यटकांचा समूह असल्याची माहिती देखील वडिलांना दिली होती. मात्र, त्यानंतर नेपाळ-तिबेट बॉर्डरच्या दिशेने प्रवास सुरू असतानाच अभिषेक यांच्याशी, त्यांचा कुटुंबीयांचा संपर्क तुटला.
अभिषेक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले, त्यांच्या मोबाईलवरही ते वारंवार फोन करत होते. तसेच उपलब्ध प्रशासकीय यंत्रणांशी संपर्क साधून त्यांच्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही अभिषेक यांच्याशी थेट संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे तातडीने शोधमोहीम राबवून अभिषेक यांचा ठावठिकाणा शोधण्याची मागणी केली..
AIच्या मदतीने मिळाली ‘सेफ झोन’ची माहिती
अडकलेल्या अभिषेक यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी AIच्या माध्यमातूनही उपलब्ध माहितीचा शोधण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक हे ‘सेफ झोन’मध्ये असल्याचे संकेत मिळाले, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या माहितीनंतर अभिषेक सुखरूप असण्याची शक्यता निर्माण झाल्याने कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला. प्रशासनाकडे आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून माहिती दिली असा दावा अभिषेकच्या कुटुंबीयांनी केला. मात्र त्यानंतरही त्यांच्या शोधासाठी अपेक्षित स्वरूपाची कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याचे सांगत कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अभिषेकचा तातडीने शोध घेण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.
