विदेशात राहुल गांधी यांच्याकडून चीनचे भरभरुन कौतुक, काश्मीरवर मांडली नकारात्मक भूमिका

चीन सरकार एखाद्या कॉर्पोरेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे प्रत्येक माहितीवर सरकारचे पूर्ण नियंत्रण असते. परंतु भारत आणि अमेरिकेत अशी परिस्थिती नाही.

विदेशात राहुल गांधी यांच्याकडून चीनचे भरभरुन कौतुक, काश्मीरवर मांडली नकारात्मक भूमिका
राहुल गांधी
Jitendra Zavar | Updated on: Mar 04, 2023 | 11:40 AM

लंडन : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांचा विदेशातील दौरा नेहमीच वादळी ठरत असतो. विदेशात जाऊन त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद भारतात उमटत असतात. आता पुन्हा विदेशात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद भारतात उमटले आहेत. केंब्रिज विद्यापीठात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनचे भरभरुन कौतूक केले आहे. पण फक्त येथेच ते थांबले नाही, पुढे जाऊन काश्मीरवर नकारात्मक वक्तव्य केले आहे. तसेच भारत, अमेरिकेसंदर्भातही टीकात्मक सूर आवळला आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन आता भारतात वाद सुरु झाला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात चीनचे कौतुक केले आहे. चीन हा शांततेचा समर्थक आहे. चीनमध्ये तुम्हाला ज्या प्रकारची पायाभूत सुविधा दिसतात, रेल्वे, विमानतळ दिसतात, हे सर्व निसर्गाशी जुळले आहे. चीनचे निसर्गाशी घट्ट नाते आहे. चीनला शांततेत किती रस आहे हे सांगण्यासाठी हे पुरेसे आहे. परंतु अमेरिकेचा विचार केला तर तो स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजतो.

चीन सरकार एखाद्या कॉर्पोरेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे प्रत्येक माहितीवर सरकारचे पूर्ण नियंत्रण असते. परंतु भारत आणि अमेरिकेत अशी परिस्थिती नाही. त्यामुळेच चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत आतापर्यंत प्रगती केली आहे, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

काश्मीर काय बोलले राहुल गांधी

राहुल यांनी आपल्या भाषणात पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख केला. त्यांनी जम्मू-काश्मीरला ‘तथाकथित हिंसक ठिकाण’ म्हटले. ज्या ठिकाणी आमचे ४० जवान शहीद झाले त्या ठिकाणीही मी गेलो होतो.

भारतात लोकशाही धोक्यात


भारतात लोकशाही धोक्यात आहेत. माझ्या फोनमध्येही पेगासस होता. मला गुप्तचर अधिकाऱ्यांनी फोनवर काळजीपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला होता. कारण फोन रेकॉर्ड होत आहे. भारतात विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्यावर अनेक खटले दाखल झाले. अनेक खटले ओढून-ताणून तयार केले गेले आहे. राहुल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यांवरुन भारतीय जनता पक्षाने त्यांना घेरले आहे. विदेशातील जमीनवर राहुल गांधी भारताची बदनामी करत असल्याचे भाजपने म्हटले आहे.

Follow Us