रशियाने खरी मैत्री जपली, तेल संकटाच्या काळात पुन्हा भारताच्या मदतीला… तेल पुरवठ्याबाबत मोठी अपडेट

Russia India Friendship : भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रशियाची सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टने भारताला रशियन कच्च्या तेलाचा पुरवठा अखंड सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे.

रशियाने खरी मैत्री जपली, तेल संकटाच्या काळात पुन्हा भारताच्या मदतीला... तेल पुरवठ्याबाबत मोठी अपडेट
India Russia OIL trade
Image Credit source: Google
| Updated on: Jun 06, 2026 | 10:52 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगाचा तेलपुरवठा विस्कळित झाला आहे. अशातच आता भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रशियाची सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टने भारताला रशियन कच्च्या तेलाचा पुरवठा अखंड सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे. तेल पुरवठा आणि शिपिंग मार्गांबाबत संकट वाढत असताना रशियाचे हे आश्वासन भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे भारतात तेलाची उपलब्धता आणि किंमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. या निर्णयामुळे रशिया हा भारताचा खरा मित्र आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

रशियन सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टचे प्रमुख इगोर सेचिन यांनी सांगितले की भारत आणि चीनला रशियन तेलाचा पुरवठा स्थिर राहील. रशिया हा जागतिक ऊर्जा बाजारातील महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला सप्लाय चेनमधून वेगळे करता येणार नाही. भारत आणि चीनसोबतची रशियाची ऊर्जा भागीदारी दोन्ही बाजूंना फायदेशीर ठरली आहे. एप्रिल 2022 पासून आतापर्यंत भारत आणि चीनला सवलतीच्या दरात रशियन तेल मिळाल्यामुळे 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे या देशांना महागड्या आंतरराष्ट्रीय बाजारावरचे अवलंबित्व कमी करण्यास मदत झाली आहे.

भारतासाठी रशियन तेल का महत्त्वाचे?

रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने अनेक देशांना सवलतीच्या दरात कच्चे तेल विकण्यास सुरुवात केली होती. याचा सर्वात मोठा फायदा भारताला झाला. भारताने रशियाकडून तेल आयात वाढवली, ज्यामुळे देशाच्या आयात खर्चात घट झाली आणि देशांतर्गत इंधन दरांवरील दबाव कमी झाला. आज रशिया हा भारताच्या प्रमुख तेल पुरवठादारांपैकी एक बनला आहे. भारत आपल्या एकूण तेल गरजांचा मोठा हिस्सा आयातीद्वारे पूर्ण करतो. त्यामुळे स्थिर आणि स्वस्त पुरवठा हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक मानला जातो.

आगामी काळात भारताची ऊर्जा मागणी वाढणार

इगोर सेचिन यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, 2035 पर्यंत भारताचा तेल वापर दररोज सुमारे 80 लाख बॅरलपर्यंत पोहोचू शकतो. हा सध्याच्या पातळीपेक्षा जवळपास 44 टक्के अधिक असेल. वेगवान आर्थिक विकास, औद्योगिक विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे भारत जगातील ऊर्जा मागणी वाढवणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक राहणार आहे. अशा परिस्थितीत रशिया आणि भारतातील ऊर्जा सहकार्य आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

Follow Us