
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मृतांचा आकडा 27 वर पोहोचला आहे. घटनास्थळी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हा हल्ला झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, तमिळनाडू, उडिसा, महाराष्ट्र या राज्यातील पर्यटकांवर हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर त्यांची नावं विचारून हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एक पर्यटक गंभीर जखमी आहे. तर इतर तीन पर्यटक जखमी आहेत. या सर्वांवर रुग्णालया उपचार केले जात आहेत.
हा भ्याड हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे अमित शाहांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केल करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संवेदना व्यक्त करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला, त्या भागात सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तपास यंत्रणादेखील या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत आहेत. दरम्यान, या हल्ल्यात जमखी झालेल्यांवर उपचार चालू आहेत. यातील काही लोक हे गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तक केली जात आहे.