‘बांगलादेश कसला हा तर पाकिस्तान’, भारताला धोका काय? शेख हसीना यांच्या मुलाने सांगितला तो खतरनाक ‘प्लॅन’
Sajeeb Wazed on Bangladesh: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुलगा आणि माजी सल्लागार सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेशमधील परिस्थितीवरून तिखट प्रतिक्रिया दिली

माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार दोन वर्षांपूर्वी उलथवण्यात आले. 5 ऑगस्ट 2024 रोजी त्यांना पतंप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्यानंतर बांग्लादेश हा कट्टरपंथियांच्या हाती गेल्याचे चित्र समोर आले होते. आता सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीला बहुमत मिळाले. तारिक रहमान यांना संधी मिळाली. काल शेख हसीना यांनी पत्रकार परिषद घेत आपण डिसेंबरमध्ये देशात परतणार असल्याचे स्पष्ट केले. दहशतवाद्यांना सोडण्यात येत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तर त्यांचा मुलगा माजी सल्लागार सजीब वाजेद जॉय याने सध्याच्या सरकारवर हल्लाबोल केला. बांग्लादेश हा दुसरा पाकिस्तान होत असल्याची तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोघांनी बांगलादेशातील परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली.
दोन वर्षानंतर शेख हसीना सर्वांसमोर
शेख हसीना यांनी नवी दिल्लीतील फॉरेन कॉरेस्पॉन्डेंट्स क्लब ऑफ साऊथ आशियामधील कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सत्तेतून परागंदा झाल्यावर आणि निर्वासित झाल्यावर त्या सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच काल जगासमोर आल्या. त्यांनी बांगलादेशात दहशतवाद्यांना मुक्त करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी सध्याच्या देशातील परिस्थितीवर टीकास्त्र सोडले.
बांग्लादेश नाही दुसरा पाकिस्तानच
शेख हसीना यांचा मुलगा आणि माजी सल्लागार सजीब वाजेद जॉय याने बांग्लादेश हा दुसरा पाकिस्तान होत असल्याचा आरोप केला. भारतासाठी सुद्धा ही चिंतेची बाब असल्याचा दावा त्यांनी केला. मुहम्मद युनूस यांच्या काळात बांगलादेशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली. देश आता राजकीय, आर्थिक, सामाजिक अराजकतेकडे वाटचाल करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. जॉय यांनी आरोप केला की हसीना सरकार सत्तेतून गेल्यानंतर पोलिसांच्या कोठडीत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ज्यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी राजकीय हत्या केल्या त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अनेकांचा मृत्यू, सरकार आकडे लपवत आहे
जुलै ते ऑगस्ट 2024 या दरम्यान विद्यार्थी आंदोलनाच्या आडून राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, त्यांचे कुटुंबिय यांच्यावर हल्ले करण्यात आले. त्यात 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर सरकारने आतापर्यंत केवळ 800 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आणले आहे. सरकार आकडेवारी लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसच हल्लेखोर आणि खुन करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकणाची नि:पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. एका दाव्यानुसार, पाकिस्तानचे एजंट आणि धर्मोपदेशक हे बांगलादेशमध्ये भारतविरोधी वातावरण तयार करत आहेत.