बांग्लादेशमध्ये हिंसक आंदोलन, बांग्लादेशच्या पंतप्रधान भारतात दाखल

बांगलादेशात आरक्षणाबाबत सुरू झालेल्या आंदोलनामुळे शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आहे. इतकंच नाही तर त्यांच्यावर देश सोडण्याची वेळ आली आहे. हिंसाचार आणि जाळपोळ होत असल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे.

बांग्लादेशमध्ये हिंसक आंदोलन, बांग्लादेशच्या पंतप्रधान भारतात दाखल
shailesh musale | Updated on: Aug 05, 2024 | 4:22 PM

PM Sheikh Hasina l मोठ्या प्रमाणात आंदोलन चिघळल्यानंतर विद्यार्थ्यांनी जाळपोळ सुरु केली आहे, हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. लोक रस्त्यावर उतरली आहेत. सर्वत्र हिंसाचार होत आहे. सरकारी मालमत्तेंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आहे. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याविरोधात सुरु असलेलं हिंसक आंदोलन पाहता त्यांनी देश सोडला असून त्या विशेष हेलिकॉप्टरने भारतात दाखल झाल्या आहेत.

300 जणांचा मृत्यू

बांगलादेशातील परिस्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. देशात कर्फ्यूला झुगारुन आंदोलक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन आंदोलनासाठी शाहबाग चौकात लाँग मार्चसाठी जमले आहेत. आतापर्यंत हिंसाचारात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

बांगलादेशात अंतर्गत कलहामुळे पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणी होत होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला आहे.  विद्यार्थी नेत्यांनी सविनय कायदेभंग आंदोलनाची घोषणा केलीये. बांगलादेशमध्ये गेल्या दोन दिवसात हिंसाचार वाढला आहे. पहाटे बांगलादेशातील विविध भागात निदर्शक जमले होते. शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलक आणि सत्ताधारी समर्थकांमध्ये हाणामारी देखील झालीय. आंदोलन इतके हिंसक झाले की पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट सुरु झाली. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचे गोळे सोडले. पण अनेक पोलिसांना देखील आपला जीव गमावावा लागला आहे.

बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देखील भारतीय नागरिकांना बांगलादेशात न जाण्याचा सल्ला दिलाय. सध्या बांगलादेशमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांच्या आपत्कालीन फोन नंबरद्वारे संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय सरकारने यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us