India’s Titanic tragedy : 700 जणांसह जलसमाधी घेतलेल्या ‘रामदास’ बोट दुर्घटनेची 75 वर्ष..

| Updated on: Aug 13, 2022 | 10:43 AM

येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. मात्र 75 वर्षांपूर्वीच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत 700 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते.

India’s Titanic tragedy : 700 जणांसह जलसमाधी घेतलेल्या रामदास बोट दुर्घटनेची 75 वर्ष..
Follow us on

येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष (75th Independence Day) पूर्ण होत आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. मात्र 75 वर्षांपूर्वीच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत 700 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. 17 जुलै 1947 साली भाऊच्या धक्क्यावरून अलिबागमधील रेवसकडे निघालेल्या एस.एस. रामदास (Ramdas ship) या बोटीला जलसमाधी मिळाली होती. त्यामध्ये 700 प्रवाशांचाही (700 passengers killed) दुर्दैवी मृत्यू झाला होता. ‘टायटॅनिक’ बोट बुडाल्याची जगप्रसिद्ध घटना सर्वांनाच माहीत असेल, त्यावर काढण्यात आलेला चित्रपटही अनेकांनी पाहिला असेल. मात्र आपल्याच देशात घडलेली ‘रामदास’ बोटीच्या दुर्घटनेलाही 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र बऱ्याच जणांना तर हे माहीतही नाही. तर अनेकांच्या स्मृतीपटलावरून ही घटना आता पुसली गेली असेल.

रामदास बोट ही स्कॉडलंडमध्ये 1936 साली बांधण्यात आली

1947 रोजी बुडालेली रामदास बोट ही स्कॉडलंडमध्ये 1936 साली बांधण्यात आली होती. 406 टन वजनाच्या या देखण्या बोटीची 1000 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती. 17 जुलै 1947 साली ही बोट मुंबईतील भाऊच्या धक्क्याहून रेवसला जाण्यासाठी निघाली होती. मात्र मुंबईपासून अवघ्या काही मैलांच्या अंतरावर करंजा- काशाजवळ बुडाली. ही बोट निघण्याच्या आदल्या दिवशी मुंबईत तूफान पाऊस झाला होता. मात्र बोटीचा प्रवास सुरू झाला, तेव्हा आभाळ अगदी स्वच्छ, निरभ्र होतं. श्रावण महिन्याला लवकरच सुरूवात होणार होती, त्यामुळे अनेकांची ‘गटारी’साठी घरी पोहोचण्याची लगबग सुरू होती. या दुर्घटनेच्या दिवशी या बोटीवर 800 हून अधिक प्रवासी होते. मात्र त्यापैकी जेमतेम 100 लोकांचा जीव वाचला, त्यामध्ये बोटीचा कप्तान आणि काही प्रवाशांचा समावेश होता.

हे सुद्धा वाचा

मुंबईहून निघाल्यापासून अवघ्या तासाभरात बोट बुडाली

‘रामदास’ बोट मुंबईहून निघाली तेव्हा वातावरण निरभ्र होते, अनेक जण एकमेकांशी गप्पाही मारत होते. थोड्याच वेळात ते आपल्या इच्छित स्थळी उतरून घराच्या दिशेने वाटचाल सुरू करणार होते. मात्र मुंबईपासून अवघ्या काही मैलांवर बोट पोहोचली असता सोसाट्याचा वारा सुटला आणि प्रचंड लाटा उसळू लागल्या. लाटांच्या प्रचंड तडाख्यामुळे बोट हेलकावे खाऊ लागली. प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली आणि एकच गोंधळ माजला. मुंबईहून निघाल्यापासून अवघ्या तासाभरात ही बोट बुडाली आणि शेकडो प्रवाशांना जलसमाधी मिळाली.

आणि एकच हाहा:कार उडाला…

साधारणत: दीड तासात रेवासला पोचणारी बोट बराच वेळ उलटून गेल्यानंतरही बंदरात न पोचल्याने कंपनीचे अधिकारीही काळजीत पडले. मात्र त्यावेळी बोटीवर काही संपर्काचे काही साधनही उपलब्ध नसल्याने काहीच माहिती मिळत नव्हती. बऱ्याच तासांनतर गेट वे ऑफ इंडियाजवळ गस्त घालणाऱ्या एका नौकेला बारकू मुकादम हा अवघ्या 12 वर्षांचा एक मुलगा पोहोताना आढळला. त्याची सुटका करण्यात आल्यानंतर, त्याच्या तोंडून ‘रामदास’ बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना सर्वांना समजली आणि एकच हाहा:कार उडाला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बोटीवरील अवघ्या 100 लोकांना जीव वाचवण्यात यश मिळाले होते. त्यामध्ये बोटीचा कप्तान, काही सहाय्यक आणि प्रवाशांचा समावेश होता. त्यापैकी एक व्यक्ती ज्यू होती, तर काही ब्रिटीश नागरिकांचाही समावेश होता. उरलेले सुमार 700 प्रवासी समुद्रतळाशी पोचले होते. त्यापैकी बरेच जण मुंबईतील गिरगाव, लालबाग येथील रहिवासी, मध्यवर्गीय नागरिक होते.