‘भारतात 2030 पर्यंत 3 कोटी 40 लाख नागरिकांच्या नोकऱ्या जाणार’

| Updated on: Jul 04, 2019 | 4:40 PM

भारतात 2030 पर्यंत जवळपास 34 मिलियन (3 कोटी 40 लाख) नागरिक आपल्या नोकऱ्या गमावतील. यामागे प्रमुख कारण ‘ग्लोबल वॉर्मिंग’ असेल, असा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) दिला आहे.

भारतात 2030 पर्यंत 3 कोटी 40 लाख नागरिकांच्या नोकऱ्या जाणार
Follow us on

नवी दिल्ली: भारतात 2030 पर्यंत जवळपास 34 मिलियन (3 कोटी 40 लाख) नागरिक आपल्या नोकऱ्या गमावतील. यामागे प्रमुख कारण ‘ग्लोबल वॉर्मिंग’ असेल, असा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) दिला आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात जगभरात किती नोकऱ्या जाणार याचीही आकडेवारी दिली आहे. ‘वर्किंग ऑन अ वार्मर प्लेनेट: द इंपेक्ट ऑफ हीट स्ट्रेस ऑन लेबर प्रॉडक्टिविटी अँड डिसेंट वर्क’ असे या अहवालाचे नाव आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रभावामुळे जगभरात जवळपास 80 मिलियन (8 कोटी) लोकांच्या नोकऱ्या जातील. यात एकट्या भारतात 3 कोटी 40 लाख नोकऱ्या जातील.

जागतिक तापमान वाढीमुळे नागरिकांच्या शारीरिक क्षमता कमी होतील. वातावरणात 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आणि अधिक आद्रता असल्याने शारीरिक अशक्तपणा वाढेल, असेही नमूद करण्यात आले आहे. तापमान वाढीने काम करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. याच संस्थेने या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात 1.5 अंश सेल्सिअस वाढ होईल, असेही सांगण्यात आले होते.

अहवालात म्हटले आहे, “तापमान वाढल्याने 2030 पर्यंत कामाच्या वेळेत सरासरी 2.2 टक्के घट होईल. म्हणजेच 8 कोटी नागरिकांच्या पूर्णवेळ नोकऱ्या जातील. म्हणजेच सरासरी 2,400 बिलियन डॉलरचे जागतिक नुकसान होईल. भारतात ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2030 पर्यंत सरासरी 5.8 टक्के कामाच्या वेळेत घट होईल. याचाच अर्थ 3 कोटी 40 लाख नागरिकांच्या नोकऱ्या जातील.”

जागतिक तापमान या शतकाच्या शेवटी 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढणार नाही या अंदाजावरच संबंधित अहवाल असल्याचेही आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नमूद केले आहे.