‘…त्यावेळी मी खूप रडायचो’, आमिर खानने सांगितला आयुष्यातला सर्वात कठीण क्षण

| Updated on: Oct 07, 2020 | 8:46 AM

बेनेट युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांशी बोलताना आमिर खानने त्याचं करिअर आणि त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या.

...त्यावेळी मी खूप रडायचो, आमिर खानने सांगितला आयुष्यातला सर्वात कठीण क्षण
Follow us on

नवी दिल्ली : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. आमिर बॉलिवूडमधल्या सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गल्ला जमावणाऱ्या चित्रपटांच्या यादीत जास्तीत जास्त चित्रपट आमिर खानचे आहेत. परंतु तरीदेखील एक असा काळ होता जेव्हा आमिर खान अपयशी होत होता. त्याला वाटत होतं की त्याचं करिअर बरबाद होत चाललंय. या चिंतेत तो रोज घरात बसून रडायचा. याबाबत स्वतः आमिरनेच खुलासा केला आहे. (Aamir Khan Talks About His Life and Acting Journey in Bennett University)

बेनेट युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांशी बोलताना आमिरने त्याचं करिअर आणि त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. आमिर म्हणाला की, ‘माझं करिअर कधीच सोपं नव्हतं. मी माझ्या करिअरकडे पाहून खूप दुःखी व्हायचो, मला वाटायचं की माझं करिअर आता संपतंय. मी घरात बसून खूप रडायचो’.

आमिर त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल एक आठवण सांगताना म्हणाला की, “कयामत से कयामत तक हा चित्रपट यशस्वी झाला. त्यानंतर मी लागोपाठ 8-9 चित्रपट साईन केले. त्यावेळी सगळेच दिग्दर्शक माझ्यासाठी नवीन आणि अनोळखी होते. माझे अनेक चित्रपट सुरु झाले. तेव्हा माध्यमातील लोक मला सांगू लागले की, तू जितके चित्रपट करतोयस त्यापैकी केवळ एकच चित्रपट चालेल, बाकीचे चित्रपट आपटतील”.

“माझं करिअर बुडत होतं. सर्वांना असं वाटत होतं की, मला किती घाई आहे. अपयशाने मी खूप दुःखी होऊ लागलो होतो. दिवसभर काम करुन मी घरी यायचो आणि माझ्या करिअरचा विचार करुन रडायचो. त्याचवेळी ज्या-ज्या लोकांसोबत काम करण्याची माझी इच्छा होती. ते लोक मात्र माझ्यासोबत काम करायला तयार नव्हते. त्यांना माझ्यासोबत काम करण्याची इच्छादेखील नव्हती”.

आमिर म्हणाला की, “कयामत से कयामत तक चित्रपटानंतर पुढील दोन वर्ष मी खूप तणावात होतं. त्याकाळात मी स्वतःला खूप कमी समजू लागलो होतो. मी साईन केलेले एकेक चित्रपट प्रदर्शित होऊ लागले, प्रत्येक चित्रपट अपयशी होत होते. त्यावेळी मला वाटू लागलं की मी आता संपतोय. जगण्यासाठीचा कोणताही रस्ता आता शिल्लक राहिलेला नाही. कारण मला माहीत होतं की, आगामी काळात माझे जे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, तेदेखील वाईटच आहेत. त्यामुळे ते चित्रपटदेखील फ्लॉप होणार आहेत”.

त्यानंतर आमिरने वेळ घेतला. आमिर खूप निवडक चित्रपटांमध्ये काम करु लागला. गेल्या काही वर्षांपासून तर आमिर एक-दोन वर्षातून एखादा चित्रपटच करतो. त्या एका चित्रपटावर खूप लक्ष केंद्रित करतो. प्रत्येक चित्रपट परफेक्ट कसा होईल यावर मेहनत घेतो. त्यात त्याला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळेच आता त्याची ओळख मिस्टर परफेक्शनिस्ट अशी झाली आहे.

संबंधित बातम्या

Mirzapur 2 | ‘कालीन भैया’, ‘गुड्डू’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, ‘मिर्झापूर 2’चा ट्रेलर प्रदर्शित!

बॉलिवूडवरील ड्रग्सबद्दलचे आरोप अक्षय कुमारला मान्य, सुशांत सिंह प्रकरणावरही पहिल्यांदाच मत मांडलं

BellBottom Teaser | बहुप्रतीक्षित ‘बेलबॉटम’चा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमार पुन्हा ‘खिलाडी’ अंदाजात!

(Aamir Khan Talks About His Life and Acting Journey in Bennett University)