थंडीत घसरता पारा, वाढते प्रदूषण, ‘AIIMS’ संचालकांना कोरोना संसर्ग वाढण्याची धास्ती

| Updated on: Nov 24, 2020 | 6:47 PM

लग्नासारख्या समारंभात फोटो काढण्यासाठी मास्क खाली केले जातात, याकडे रणदीप गुलेरिया यांनी लक्ष वेधले.

थंडीत घसरता पारा, वाढते प्रदूषण, AIIMS संचालकांना कोरोना संसर्ग वाढण्याची धास्ती
Follow us on

नवी दिल्ली : हिवाळ्यात घसरणारा तापमानाचा पारा, वाढते प्रदूषण, सणासुदीच्या काळात नागरिकांनी बाळगलेली हलगर्जी आणि सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती  दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी वर्तवली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी गुलेरियांनी काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. फोटो काढतानाही मास्क खाली करु नका, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. (AIIMS Director Randeep Guleria warns about Corona Crisis alerts citizens to follow protocols)

सण-उत्सवाच्या काळात कोरोनापासून बचावाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. लग्नासारख्या समारंभात फोटो काढण्यासाठी मास्क खाली केले जातात. कोरोना टाळण्यासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे, याकडे रणदीप गुलेरिया यांनी लक्ष वेधले.

कोरोनाचे संकट वाढत असतानाच हृदयाशी निगडीत आजार असलेल्या व्यक्ती, मधुमेह, रक्तदाब अशा सहव्याधी असलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांनी घराबाहेर पडणे टाळावे. अत्यंत आवश्यकता असेल, तेव्हाच त्यांनी बाहेर जावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कायम मास्क घालावा, अशा सूचना गुलेरियांनी दिल्या. फुफ्फुस आणि हृदयाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी हिवाळ्याच्या मोसमात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

युरोपीय देशांमध्ये कोरोना परतला आहे. नागरिकांनी पूर्वीप्रमाणे कोरोनाविषयी काळजी घेणं बंद केलं आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या हंगामात, छठ पूजेसाठी लोक बाजारात गेले, अनेकांनी मास्क घालणे सोडले, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. लोकांनी समारंभ आयोजित करण्यास सुरुवात केली. विवाह सोहळे होऊ लागले, लोकांनी छायाचित्र काढण्यासाठी मास्क घालणे बंद केले. या सर्व कारणांमुळे विषाणूचा प्रसार होण्यास हातभार लागला, अशी खंत गुलेरिया यांनी व्यक्त केली.

हिवाळ्यात श्वसनमार्गे विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. लोक हिवाळ्यामध्ये घरांमध्ये बंदिस्त असतात. कमी व्हेंटिलेशनमुळे असे विषाणू देखील पसरतात. उत्तर भारतात प्रदूषणाची पातळी गेल्या काही दिवसांत वाढली आहे. प्रदूषण जसजसे वाढत जाते, तसतसे कोरोनाचेही प्रमाण वाढते, त्यास संबंधित धोके देखील वाढतात, असे दिसून आल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

देशाच्या तुलनेत आपला ग्रोथ रेट कमी, महाराष्ट्र सेफ झोनमध्ये; आता दिवसाला 90 हजार टेस्टचे लक्ष्य : राजेश टोपे

कोरोना निगेटिव्ह असाल तरच महाराष्ट्रात प्रवेश; दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातील प्रवाशांसाठी ठाकरे सरकारची नियमावली

(AIIMS Director Randeep Guleria warns about Corona Crisis alerts citizens to follow protocols)