अक्षय कुमारची पाच कामं, जी महाराष्ट्र कधीही विसरु शकणार नाही

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादावर मौन सोडत नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय मला देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नसल्याचं म्हणत त्याने निरर्थक मुद्द्याला मध्ये खेचलं जात असल्याचं म्हटलंय. रिल लाईफ आणि रिअल लाईफमध्येही हिरो असलेल्या अक्षय कुमारने अनेक अभिमानास्पद कामे केली आहेत. पण त्याच्यावरच देशप्रेम सिद्ध करण्याची वेळ आली आहे. […]

अक्षय कुमारची पाच कामं, जी महाराष्ट्र कधीही विसरु शकणार नाही
Follow us on

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादावर मौन सोडत नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय मला देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नसल्याचं म्हणत त्याने निरर्थक मुद्द्याला मध्ये खेचलं जात असल्याचं म्हटलंय. रिल लाईफ आणि रिअल लाईफमध्येही हिरो असलेल्या अक्षय कुमारने अनेक अभिमानास्पद कामे केली आहेत. पण त्याच्यावरच देशप्रेम सिद्ध करण्याची वेळ आली आहे.

अक्षय कुमारचं काम

‘भारत के वीर’ला भरघोस प्रतिसाद

शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म असावा, असं मत अक्षय कुमारने व्यक्त केलं होतं. त्यानंतर गृहमंत्रालयाने याची दखल घेत अक्षय कुमारच्याच हस्ते भारत के वीर या अॅप आणि वेबसाईटला सुरुवात केली. शहिदांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी एकाच वर्षात 29 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता. या 29 कोटी रुपयांमधून 159 शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली होती. या निधीमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

दुष्काळासाठी मदत

अक्षय कुमारने बीड जिल्ह्यासोबत अनेक वेळा सामाजिक बांधिलकी दाखवली आहे. 2015 मध्ये भीषण दुष्काळ होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं होतं. यावेळी अक्षय कुमारने आत्महत्याग्रस्त 30 कुटुंबांना तब्बल पंधरा लाख रुपयांची मदत केली होती.

गरीब नवविवाहित दाम्पत्यांना 79 लाखांची मदत

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात परळीमध्ये सर्वधर्मीय 79 वधू – वरांचे शुभविवाह मोठ्या थाटात पार पडले. अक्षय कुमार यासाठी परळीत गेला होता. यावेळी त्याने प्रत्येक जोडप्याला एक लाख रुपये या प्रमाणे 79 लाख रुपयांची मदत केली.

जलयुक्त शिवार आणि सॅनिटरी पॅडसाठी मदत

एवढंच नाही तर याआधीसुद्धा अक्षय कुमारने महिलांच्या आरोग्यासाठी महत्वाचे ठरलेल्या सॅनिटरी नॅपकिनसाठी महिला बालविकास खात्याला 50 लाख रुपयांची मदत केली होती. शिवाय जलशिवार योजनेचे काम पाहून त्यावेळी देखील 30 लाख रुपयांची मदत केली होती.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मदत

14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून शहीद जवानांच्या कुटुंबासाठी मदतीचे हात पुढे सरसावले होते. त्यातच अक्षयनेही त्या 40 शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी पाच कोटी रुपयांची मदत केली. इतकंच नाही तर भारताच्या गृह मंत्रालयाच्या ‘भारत के वीर’ या वेबसाईटचा प्रचार त्याने केला. लोकांना भारतीय जवानांसाठी मदत करण्याचे आवाहन केले.