आधी सुरक्षा काढली, आता बंगला पाडणार, चंद्राबाबू निशाण्यावर

| Updated on: Jun 24, 2019 | 3:28 PM

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना झटका दिला आहे. चंद्राबाबू राहात असलेल्या ‘प्रजा वेदिका’ या इमारतीवर हातोडा चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

आधी सुरक्षा काढली, आता बंगला पाडणार, चंद्राबाबू निशाण्यावर
Follow us on

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना झटका दिला आहे. चंद्राबाबू राहात असलेल्या ‘प्रजा वेदिका’ या इमारतीवर हातोडा चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. उद्या म्हणजेच मंगळवारपासून ही इमारत तोडण्याचं काम सुरु होणार आहे. सध्या चंद्राबाबू तिथेच राहात आहेत. काही दिवसांपूर्वीच चंद्रबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना पत्र पाठवून, ‘प्रजा वेदिका’ ही इमारत विरोधी पक्षनेत्याचं निवासस्थान घोषित करण्याची मागणी केली होती. चंद्राबाबू नायडू सध्या विरोधी पक्षनेते आहेत.

आंध्रातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने शनिवारीच चंद्राबाबूंचा अमरावतीतील सरकारी बंगला ताब्यात घेतला. तेलुगू देसम पक्षाने यावर तीव्र आक्षेप घेत, ही सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचं म्हटलं. माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करायला हवा, असं टीडीपीने म्हटलं.

आंध्र प्रदेशमधून तेलंगणा विभक्त झाल्यानंतर, चंद्राबाबूंनी आंध्र प्रशासनाचा कारभार हैदराबादवरुन अमरवातीला हलवला होता. तेव्हापासूनच चंद्राबाबू अमरावतीत राहात होते. 5 कोटी रुपये खर्चून इथे ‘प्रजा वेदिका’ हे मुख्यमंत्री निवासस्थान उभारण्यात आलं होतं. इथे मुख्यमंत्री राहात होतेच, शिवाय पक्षाच्या बैठकाही होत असत.

आंध्रात सत्तापालट झाल्यानंतर जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून चंद्राबाबूंची विशेष सुरक्षा काढण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीलाच चंद्राबाबूंनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून, या इमारतीचा बैठकांसाठी उपयोग करु द्यावा, अशी मागणी केली होती. तसंच हे घर विरोधी पक्षनेत्याचं घोषित करा, अशी मागणी केली होती.

मात्र सरकारने प्रजा वेदिका ही इमारत ताब्यात घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांचं संमेलन होणार आहे. त्याआधी हे संमेलन राज्याच्या सचिवालयात होण्याचं निश्चित करण्यात आलं होतं.

सध्या चंद्राबाबू नायडू हे सट्टीसाठी कुटुंबासोबत परदेशात आहेत. मात्र तोपर्यंत इकडे कारवाईला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, टीडीपीने या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. टीडीपीचे विधानपरिषदेतील आमदार अशोक बाबू यांच्या मते, “सरकारी कर्मचाऱ्यांनी चंद्राबाबूंचं खासगी साहित्य बाहेर फेकलं. शिवाय सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती पक्षाला दिलेलीच नाही”

दुसरीकडे नगरविकास मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी टीडीपीवर हल्ला चढवला. “चंद्राबाबूंवर तशीच कारवाई होईल, जशी कारवाई जगनमोहन रेड्डींवर विरोधी पक्षनेते असताना झाली होती”, असं त्या म्हणाल्या.