आरोपपत्रच दाखल झालं नाही, मग विनयभंगाचा खटला संपला कसा?; दमानियांचा खडसेंना सवाल

| Updated on: Oct 22, 2020 | 5:56 PM

भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या विनयभंगाच्या खटल्यातून सुटलो असल्याचं म्हटलं आहे. मात्र, खडसेंचा हा दावा खोटा असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.

आरोपपत्रच दाखल झालं नाही, मग विनयभंगाचा खटला संपला कसा?; दमानियांचा खडसेंना सवाल
Follow us on

मुंबई: भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या विनयभंगाच्या खटल्यातून सुटलो असल्याचं म्हटलं आहे. मात्र, खडसेंचा हा दावा खोटा असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. या खटल्यातलं आरोपपत्रच अद्याप दाखल झालेलं नाही मग विनयभंगाचा खटला संपला कसा? असा सवाल दमानिया यांनी केला आहे. (anjali damania on eknath khadse’s statement on harassment case)

अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खडसे यांच्या दाव्यांचं खंडन केलं. मला पीआयने सांगितलं तुमची सीडी लॅबमध्ये पाठवलेली आहे. या प्रकरणाचा तपास झालेला नाही आणि तुमच्याविरोधात आरोपपत्रही दाखल झालेलं नाही. त्यामुळे तुमचा विनयभंगाचा खटला अजून संपलेला नाही, असं मला अधिकाऱ्याने सांगितलं, असं सांगतानाच विनयभंगाच्या खटल्याबाबत खडसे धांदात खोटं बोलत आहेत, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं. वाट्टेल ते बोलले. त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठीच एफआयआर दाखल केला, असंही त्या म्हणाल्या. मी दाखल केलेल्या एफआयआरवर पुढे काहीही झालं नाही. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत. याप्रकरणात फडणवीसांनी सोयीचं राजकारण केलं. कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांबाबत राजकारणी असंच राजकारण करतात, असं त्या म्हणाल्या. खडसेंवरील विनयभंगाचा गुन्हा संपलेला नाही. तरीही कालही ते वृत्तवाहिन्यांवरून धांदात खोटे बोलले. त्यामुळे माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

दमानिया भावूक झाल्या

यावेळी खडसेंकडून झालेल्या छळाची माहिती देताना दमानिया या भावूक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले होते. खडसे ज्या पद्धतीने बोलतात त्याविरोधात लढणं आवश्यक नाही का? असा सवाल करतानाच हा एफआयआर दाखल करताना आमचा दोन दिवस छळ करण्यात आला, असंही त्या म्हणाल्या. खडसे हे खूनशी प्रवृतीचे आहेत. मी भाजपचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्धही लढले. पण खडसेंनी जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल, असं त्यांनी सांगितलं. (anjali damania on eknath khadse’s statement on harassment case)

अमृता फडणवीसांबद्दलची वक्तव्ये खपवून घेतली असती का?

यावेळी दमानिया यांनी थेट फडणवीस यांच्यावरच हल्ला केला. ती बाई गोंधळ घालत होती म्हणून गुन्हा दाखल करावा लागला, असं फडणवीस म्हणाल्याचे खडसे यांनी वृत्तवाहिन्यांवर सांगितलं. अमृता फडणवीस यांच्याबद्दल खडसेंनी अशीच वक्तव्ये केली असती तर फडणवीस असंच म्हणाले असते का? एखाद्या मुख्यमंत्र्याला अशी भाषा शोभते का? असा सवालही त्यांनी केला.

याद राखा सोडणार नाही

खडसे माझ्या विरोधात जेवढे बोलतील तेवढी मी त्यांच्याविरोधात खंबीरपणे लढेल. तुम्हाला कोणत्या पक्षात जायचं ते जा. त्याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. पण याद राखा, पुन्हा जर पत्रकार परिषदांमध्ये माझं नाव घेतलं तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर याद राखा, सोडणार नाही; दमानिया यांचा इशारा

खडसेंच्या अ‍ॅक्शनमुळे राष्ट्रवादीची चांदी, हळूहळू ‘असा’ लागेल भाजपच्या गडाला सुरूंग

…तर टीआरपी घोटाळा सीबीआयकडे गेला असता; अनिल देशमुख यांचा दावा

(anjali damania on eknath khadse’s statement on harassment case)