‘अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन टाका; मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव मंजूर करावा’

| Updated on: Nov 02, 2020 | 7:04 PM

राज्य सरकारकडून 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. | Ashok Chavan

अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन टाका; मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव मंजूर करावा
Follow us on

मुंबई: राज्य सरकारने अकरावी आणि इतर शैक्षणिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी. परंतु, मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष प्रस्ताव मंजूर करावा, असे मत राज्याचे मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. मंत्रिमंडळाने याबाबत लवकरात लवकर कायदेशीर निर्णय घ्यावा. अकरावी आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्यास पुढील सर्व गोष्टींना विलंब होईल. नंतर उर्वरित वेळेत अभ्यासक्रम आटोपता घ्यावा लागेल. त्यामुळे विनाविलंब प्रवेश प्रक्रिया व्हावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे चव्हाण यांनी म्हटले. त्यामुळे आता राज्य सरकारकडून 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. (Ashok Chavan on Maratha reservation)

मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करावा आणि याच घटनापीठासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करावी, या मागणीसाठी राज्य सरकारकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला तिसऱ्यांदा विनंती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्याबाबतीत आपण निर्णायक टप्प्यावर आहोत. सरन्यायाधीशांकडून आज आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

त्यामुळे आता मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणे, हा आपल्यासाठी प्राधान्याचा मुद्दा आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशाच्या समस्या निर्माण झाले आहेत. ही बाब आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करू. मराठा आरक्षण मिळावे ही सरकारची इच्छा, पण कायदेशीर गोष्टी सरकारच्या कक्षेबाहेर आहेत. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता भविष्यात सकारात्मक गोष्टी घडतील, अशी आशा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं काही राजकीय पक्षाचं षडयंत्र; अशोक चव्हाण यांचा आरोप
मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार कमी पडतंय असं म्हणण्यात काहीही तथ्य नसल्याचं सांगत मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा काही राजकीय पक्षांचं षडयंत्र असल्याचा आरोप मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. मात्र, हे राजकीय पक्ष कोणते? यावर त्यांनी काहीही भाष्य केलं नाही.

मराठा समाजाने आंदोलन करण्यास आमचा विरोध नाही. आंदोलन करणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र, सरकार हे सर्व कोणासाठी करत आहे? मराठा आंदोलकांकडे राज्य सरकारपेक्षा चांगले वकील असतील तर त्यांनी तसे सांगावे. आपण एकत्रपणे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करु, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

… तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल; शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी घटनापीठाचा निर्णय लवकरच, सरन्यायाधीशांचे सूतोवाच, अशोक चव्हाणांची माहिती

(Ashok Chavan on Maratha reservation)