मनोज जरांगे हे मानसिकदृष्ट्या विकृत, मंत्री बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजपचे प्रत्युत्तर
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील हे सातत्याने भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. आता या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. जरांगे पाटील यांनी मराठ्यांचे जात प्रमाणपत्र अवैद्य ठरवण्याचे आदेश बीडमध्ये बावनकुळेंनी दिल्याचा दावा केला होती. तसेच जरांगे यांनी थेट बाहुबली सिनेमातील संवाद भरसभेत बोलून दाखवला होता. आआथातू अरअरअर… अरअरअर पा पा पा पपप पा तिरर्रे… अशी डायलॉगबाजी मनोज जरांगे यांनी केली होती. यानंतर आता भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांनी जरांगे पाटलांनी उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जरांगे पाटील हे मानसिकदृष्ट्या विकृत…
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रहांगडाले यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. जरांगे पाटील हे मानसिकदृष्ट्या विकृत स्वभावाचे असून त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, अशी घणाघाती टीका रहांगडाले यांनी केली आहे.
कुणाला काय बोलावे याचं भान उरलं नाही
विजय रहांगडाले यांनी, ‘राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात कोणावरही टीका करताना भाषेची मर्यादा आणि आचारसंहिता पाळणे अत्यंत गरजेचे असते. टीका सकारात्मक किंवा योग्य दृष्टिकोनातूनही करता येते, मात्र मनोज जरांगे पाटील हे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कोणाला काय आणि कसे बोलावे याचे भान त्यांना उरलेले नाही’ अशा शब्दात मनोज जरांगे यांचा समाचार घेतला आहे.
बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका करणार नाही – जरांगे पाटील
दरम्यान, जरांगे पाटलांनी बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका केली होती. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, मराठा समाजाच्या आड कुणीही आला तरी त्याला गुडघे टेकायला लावतो. मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणूंन तुम्ही रडकुंडीला आलात, तुम्ही परळीच्या टोळीच्या नादेला लागलात म्हणून तुमच्यावर ही वेळ आली आहे. तुम्ही त्यांचं ऐकून मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं. एकवेळ तुम्हाला माफ करतो, यापुढे तुमचं व्यंग करणार नही, पण परळीची टोळी तुमच्याजवळ दिसली नाही पाहिजे. 28 ऑगस्टच्या आत तुम्ही पत्र दिलेली चूक दुरुस्त करून द्या, रद्द केलेले प्रमाणपत्र वैध करून द्या. एक वेळ तुम्हाला माफ करतो पण परळीची टोळी तुमच्या जवळ दिसायला नको, यापुढे तुमचं व्यंग करणार नाही.
