जयंतराव, काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना कुठे आहे? भाजपचे हजारो कार्यकर्ते कोरोना लढ्यात : चंद्रकांत पाटील

| Updated on: Apr 11, 2020 | 9:41 PM

चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडी सरकारच्या घटक पक्षांचं योगदान काय असा प्रश्न उपस्थित केला आहे (Chandrakant Patil on criticism by Jayant Patil).

जयंतराव, काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना कुठे आहे? भाजपचे हजारो कार्यकर्ते कोरोना लढ्यात : चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : सत्ताधारी आणि विरोधीपक्षात मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेवर नियुक्ती सदस्य करण्यावरुन आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. यावेळी जयंत पाटील यांनी विरोधी पक्षांना कोरोनाविरोधातील कामावर लक्ष देण्यास सांगितलं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडी सरकारच्या घटक पक्षांचं योगदान काय असा प्रश्न उपस्थित केला आहे (Chandrakant Patil on criticism by Jayant Patil).

चंद्रकांत पाटील म्हणाले “जयंतराव, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा. त्यांना त्याची गरज सगळ्यात जास्त आहे. भाजपचे हजारो कार्यकर्ते आज राज्यभर जीव तोडून मदत कार्य करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 560 कम्युनिटी किचन्स चालवली जात आहेत. 43 लाख कुटुंबांना जेवण किंवा शिधा पुरवला जात आहे. 6.50 लाखांपेक्षा जास्त मास्क आणि 4.75 लाख सॅनिटायझरचे वाटप केले आहे.”

5 हजार युनिट्स रक्त गोळा केले आहे. रक्त ठेवायला जागा नाही, असं रक्तपेढ्यांनी सांगितल्यामुळे रक्तदान थांबवून रक्तदात्यांच्या याद्या तयार करायला सुरुवात केली. आज 22 हजार रक्तदात्यांची यादी भाजप कार्यकर्त्यांकडे तयार आहेत. भाजपाचे सर्व नेते, आमदार, खासदार, सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी स्वत: हे काम करत आहेत. कोरोन विरुद्धची लढाई भाजप पूर्ण गांभिर्याने लढत आहे. मात्र, या सर्व लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस किंवा शिवसेना कुठे आहे? याची माहिती जयंत पाटील यांनी द्यावी, अशीही मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

“आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का?”

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबद्दल जयंत पाटलांच्या टीकेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांकडे अजून 2 महिने आहेत. हाच ठराव मंत्रिमंडळाने मे जूनमध्ये केला असता तरी चालणार होते. आता कोरोनाविरुद्धची लढाई लढायचे सोडून हा ठराव करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक का बोलवावी लागली हा माझा प्रश्न होता. आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का? ज्या 2 रिक्त जागांचा उल्लेख आपण करत आहात त्यांनी पूर्वीच राजीनामे दिलेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला म्हणून राजीनामे दिलेत. मुख्यमंत्र्यांना जागा रिकामी करून देण्यासाठी दिलेले नाहीत.”

राजकारण करणे, विरोधकांना आपल्या बंगल्यांवर अपहरण करुन आणून मारहाण करणे, आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्यांच्या मौजमजेची व्यवस्था करणे, आपल्या स्वीय सहायकाला अडवले म्हणून पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करणे, अधिकाऱ्यांना वेठीला धरुन विश्रामगृहांवर पार्ट्या करणे याखेरीज करण्यासारखी असंख्य कामे आहेत. त्याबाबत जयंत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे, असाही खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना दिला.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री राज्यपाल कोट्यातून आमदार होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट

राज्यपाल नियुक्त सदस्यावरुन चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट, जयंत पाटलांचं उत्तर

Chandrakant Patil answer to criticism of Jayant Patil