संगणक परिचालकांबाबत येत्या दहा दिवसात निर्णय : मुख्यमंत्री

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : आयटी महामंडळात सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील संगणक परिचालकांचं मुंबईतील आंदोलन चौथ्या दिवशी मागे घेण्यात आलं. येत्या दहा दिवसात यावर निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय संगणक परिचालक संघटनेने घेतला. गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन सुरु होतं. आपले सरकारमध्ये काम करून गेल्या सात वर्षात […]

संगणक परिचालकांबाबत येत्या दहा दिवसात निर्णय : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : आयटी महामंडळात सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील संगणक परिचालकांचं मुंबईतील आंदोलन चौथ्या दिवशी मागे घेण्यात आलं. येत्या दहा दिवसात यावर निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय संगणक परिचालक संघटनेने घेतला. गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन सुरु होतं.

आपले सरकारमध्ये काम करून गेल्या सात वर्षात डिजीटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कायम स्वरूपी सामावून घ्यावे, ही प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व पक्षाच्या सुमारे 82 आमदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या प्रश्नावर उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याबाबत उत्तर दिलं. आयटी महामंडळात सामावून घेण्याचा निर्णय धोरणात्मक असून येत्या 10 दिवसात बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल, असं त्यांनी सभागृहात सांगितलं.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलावली. त्यावेळी संघटनेच्या वतीने संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आयटी महामंडळात नियुक्ती देण्याचा निर्णय पाहिजे, आश्वासन नको, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी सभागृहात उत्तर दिलं आहे. यावेळी 10 दिवसात बैठक घेऊन नक्की निर्णय देईल.

या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार सुभाष साबणे, संघटनेचे सिद्धेश्वर मुंडे, मयूर कांबळे ,विजयकुमार वाघ, मुकेश नामेवार, प्रकाश कांबळे उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनस्थळी येऊन भेट दिली.

संबंधित बातम्या :

पंकजा मुंडेंनी संगणक परिचालकांच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं!

डिजीटल महाराष्ट्रचा कणा असलेल्या संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात