आदित्य ठाकरे यांचा चाकण दौरा; आमदार बाबाजी काळे अर्ध्यातून अचानक गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे यांनी काल चाकण दौरा केला. या दौऱ्यातून आमदारा बाबाजी काळे अचानक गायब झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पुण्यातील चाकण सध्या चर्चेत आहे. चाकणमधील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चाकणमधील खराब रस्त्यामुळे अनेक अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. या दोन महत्वाच्या समस्येमुळे चाकण MIDC मधील तब्बल 20 कंपन्या महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे चाकणमध्ये पोहोचले होते. या ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान अचानक आमदार बाबाजी काळे निघून गेले. बाबाजी काळे हे दौरा अर्धवट सोडून निघून गेल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवरील खड्डे आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे चाकण MIDCच्या दौऱ्यावर आले होते. याच दौऱ्यादरम्यान खेडचे शिवसेना आमदार बाबाजी काळे यांनी दौरा अर्धवट सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बाबाजी काळे हे दौंड तालुक्यातील यवत येथे लग्नासाठी निघून गेल्याचे सांगितले जातंय.
बाबाजी काळेंनी घेतली होती फडणवीसांची भेट
काही दिवसांपूर्वी भीमाशंकर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या भेटीचीही आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी बाबाजी काळे यांना नेमकी कोणती ऑफर दिली होती का? आणि त्याच पार्श्वभूमीवर आमदार काळे यांनी आदित्य ठाकरे यांच्या चाकण MIDC दौऱ्यातून काढता पाय घेतला का? विशेष म्हणजे MIDC संदर्भात महत्वाची पत्रकार परिषद असताना ते उपस्थित का राहिले नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
‘चाकणला मुंढे यांच्यासारखा अधिकारी द्या’
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांची पाहणी केल्यानंतर उद्योजकांशी देखील चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. भ्रष्टाचार, नियोजनाच्या अभावी उद्योजक सोडून चालले आहे. चाकण MIDC ला आता तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी द्या, अशी मागणी ठाकरेंनी केली. आदित्य ठाकरे यांच्या मागणीवर सत्ताधारी काय बोलतात, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. तर उद्योग मंत्री उदय सामंत आज रविवारी चाकणचा दौरा करणार आहे.
