दिल्ली पेटली, हिंसाचारात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 200 जखमी

| Updated on: Feb 26, 2020 | 10:32 AM

राजधानीच्या उत्तर पूर्व भागातील हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे. तर 200 लोक जखमी झाले आहेत.

दिल्ली पेटली, हिंसाचारात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 200 जखमी
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली गेल्या दोन दिवसांपासून धुमसत आहे (Delhi Violence ). नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन (सीएए) दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. राजधानीच्या ईशान्य भागातील हिंसाचारात आतापर्यंत 17 जणांचा बळी गेला आहे, तर 56 पोलिसांसह जवळपास 200 नागरिक जखमी झाले आहेत. ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचारानंतर जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर आणि चांदबाग मध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलन

जवाहरलाल नेहरु विद्यार्थी संघाचे (JNUSU) विद्यार्थी आणि नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या काही जणांनी (Delhi Violence) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलन करत होते. दिल्ली हिंसाचाराच्या आरोपींविरोधात कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर शांतता ठेवण्याची मागणी या आंदोलकांची होती. या आंदोलकांना मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरुन हटवण्यात आलं आहे. केजरीवाल यांच्या घराबाहेर असलेल्या विद्यार्थांवर पाण्याचे फवारे मारुन हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अमित शाह सक्रिय

दिल्लीमध्ये अनियंत्रित झालेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीवर गेल्या 24 तासात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन बैठका घेतल्या. गृहमंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीत आयपीएस एसएन श्रीवास्तव यांच्यासह दिल्ली पोलीस आणि गृह मंत्र्यालयाचेअनेक अधिकारी उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेवर चर्चा करण्यात आली. तसेच, कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत चर्चा झाली. आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

तणावग्रस्त भागात परीक्षा रद्द

दिल्लीत हिंसाचारामुळे CBSE बोर्डाने बुधवारी (26 फेब्रुव्रारी) होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. “तणावग्रस्त ईशान्य दिल्लीत आज शाळा बंद राहतील. सोबतच CBSE ची आज होणारी परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली आहे”, असं उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितलं होतं. त्यानंतर (Delhi Violence) आजची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

रात्री उशिरा न्यायायात सुनावणी

CAA विरोधात झालेल्या हिंसाचारातील जखमींना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान, जखमींना घेऊन येण्यासाठी रुग्णवाहिकेची सुरक्षा आणि जखमींना योग्य वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. रुग्णवाहिकेवर संभाव्य हल्ल्याचा धोका पाहता डॉक्टरांच्या टीमने रात्री उशिरा न्यायालयाचं दार ठोठावलं. प्रकरणाचं गांभीर्य पाहता उच्च न्यायालयाने या याचिकेवर रात्री सुनावणी केली आणि मुस्तफाबादच्या रुग्णालयातील जखमींना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचे आदेश पोलिसांना दिले.

आयपीएस सच्चिदानंद श्रीवास्तव दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) विशेष संचालक (प्रशिक्षण) सच्चिदानंद श्रीवास्तव (एस.एन. श्रीवास्तव) यांना मंगळवारी अचानक त्यांच्या मूळ केडरमध्ये परत बोलावण्यात आलं. श्रीवास्तव हे 1985 च्या बॅचचे अग्मुटी केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते गेल्या अनेक काळापासून CRPF मध्ये होते. दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून त्यांना दिल्ली पोलिसांत विशेष आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक यांचे आंदोलन सुरु आहे. सोमवारी (24 फेब्रुवारी) या आंदोलनातील काही समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच रस्त्यांवरील वाहने, आजूबाजूची घरे, गोदाम-दुकाने यांनाही आग लावली. मंगळवारीही (25 फेब्रुवारी) दिल्लीत तणावपूर्ण स्थिती होती. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा दिल्लीत तैनात करण्यात आला आहे.

दिल्लीत हिंसाचार : कधी काय घडलं?

  • 22 फेब्रुवारी (रात्री 10.30 वा.) – ईशान्य दिल्लीतील जाफरबाद मेट्रो स्टेशनच्या खाली सीएएला विरोध करणाऱ्या महिला जमा झाल्या. त्यांनी मेट्रो स्टेशनजवळ रस्ता रोको आंदोलन केले.
  • 23 फेब्रुवारी (सकाळी 9 वा.) – जाफरबाद मेट्रो स्टेशनजवळील रस्ता बंद असल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामची समस्या उद्भवली. ज्यामुळे लोकांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना रस्ता रोको आंदोलन बंद करा, असे आवाहन केले. तर भाजप नेता कपिल मिश्रा ट्विट करत CAA ला समर्थन देण्यासाठी मौजपूर चौकात जमा होण्यास सांगितले.
  • 23 फेब्रुवारी (संध्याकाळी 3.30-4 दरम्यान) – CAA चे समर्थनार्थ आंदोलनावेळी कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक भाषण केले. त्यानंतर पोलिसांनी रस्ता खुला करण्यासाठी आंदोलकांना 3 दिवसांचा अल्टीमेटम दिला.
  • 23 फेब्रुवारी – बाबरपूरजवळ CAA चे समर्थन करणाऱ्यांनी काही लोकांवर दगडफेक करण्यात आली.
  • 23 फेब्रुवारी – मौजपूर, करावल नगर, बाबरपूर आणि चांद बाग परिसरात हिंसाचार सुरु झाला
  • 23 फेब्रुवारी (रात्री 9-11) – करावल नगर, मौजपूर, बाबरपूर आणि चांदबाग परिसरात आंदोलकांनी गाड्यांची जाळपोळ केली.
  • 24 फेब्रुवारी (सकाळी 10 वा.) – 23 फेब्रुवारीला रात्री पोलिसांनी दिल्लीतील सर्व स्थिती नियत्रंणात असल्याचा दावा केला. मात्र 24 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता CAA समर्थक आणि विरोधक एकमेकांसमोर आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
  • 24 फेब्रुवारी (दुपारी 12-1.30) – दुपारी बाबरपूर परिसरात काही जणांनी दगडफेक केली. काही जण या आंदोलनात मुखवटे घालून तलवार घेऊन रस्त्यावर उतरले. बाबरपूरसह करावल नगर, शेरपूर चौक, कर्दमपुरी आणि गोकलपुरी या भागातही हिंसाचार सुरु झाला.
  • 24 फेब्रुवारी – भजनपूरमध्ये बससोबतच काही वाहनांमध्ये जाळपोळ करण्यात आली. पेट्रोल पंपला काहींनी आग लावली. यात एका पोलिसाचा मृत्यू झाला. तर पोलीस उपायुक्त जखमी झाले.
  • 24 फेब्रुवारी – सकाळी सुरु झालेला हा हिंसाचार दिवसभर कायम होता. गोकलपुरीमध्ये एका टायर मार्केटला समाजकंटकांनी आग लावली.
  • 24 फेब्रुवारी – रात्री 10 वाजता मौजपूर आणि घोडा चौक परिसरात हिंसाचार झाला.
  • 25 फेब्रुवारी – पहाटे जवळपास 5 बाईकला आग लावण्यात आली, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, अग्निशमन दलाच्या एका गाडीवर दगडफेक