‘डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा’, शिवसेना आमदाराच्या मुलीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Jun 07, 2021 | 12:50 AM

आंतरराष्ट्रीय पातळीवरील 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदाराच्या मुलीने केली आहे.

डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा, शिवसेना आमदाराच्या मुलीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us on

उस्मानाबाद : आंतरराष्ट्रीय पातळीवरील 7 कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदाराच्या मुलीने केली आहे. शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आणि स्टुडन्ट हेल्पिंग युनिटच्या अध्यक्षा आकांक्षा चौगुले यांनी डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा सन्मान करावा, अशी भूमिका मांडली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे (Demand of Maharashtra Bhushan Award for Disale Guruji by daughter of Shivsena MLA).

आकांक्षा चौगुले यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे, “रणजितसिंह डिसले यांना युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तरावरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिले शिक्षक ठरले आहेत. भारतातील सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले गेले, परंतू याच्याही पलिकडे जाऊन अशा माणसांना आपण ‘महाराष्ट्रभूषण’ द्यावा, असे मला वाटते.”

“महाराष्ट्र समाजसुधारकांची भूमी आहे. या मातीने मातीचा सन्मान करणाऱ्या अनेक पिढ्या जन्माला घातल्या आहेत. डिसले गुरुजी यांना पुरस्कार देऊन आपण फक्त एका व्यक्तीचा सत्कार करणार नसून प्रत्येक खेड्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाचा सन्मान करणार आहात. हे शिक्षक मिळेल त्या साधनाने शाळेत जातात. सध्याच्या काळात तर दारो-दारी जाऊनही शिक्षण आहेत. महाराष्ट्र भूषण हा राज्यातील सन्मानाची सर्वोच्च खूण आहे. त्यामुळे नुसता गौरव करत आणि शुभेच्छा देऊन एका युवकाचं कौतुक होऊ शकते, एका शिक्षकाचं नाही,” असंही चौगुले यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

“आधी शिक्षक गावात पोहचत नव्हते, आता रेंज पोहचत नाही”

या निवेदनात आकांक्षा चौगुले यांनी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामीण भागातील सुविधा यावर नाराजीही व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रात जोतिबा फुलेंसारख्या माणसाने शिक्षणाची ज्योत लावली आणि तिचा भारतभर प्रकाश पडला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वेंसारख्या महामानवाने या ज्योतीची मशाल केली आणि तळागाळात शिक्षण पोहचवलं. विद्यार्थी संख्येचे कारण देऊन अनेक ठिकाणच्या शाळा बंद केल्या जात आहे. कुठल्या शाळेचे पत्रे गायब आहेत तर कुठल्या शाळेला लग्नाचे मंगल कार्यालय केलं आहे. आधी शिक्षक गावात पोहचत नव्हते आता रेंज पोहचत नाही. शिक्षणाचे आधुनिकीकरण होत आहे, पण आधुनिकतेच्या व्याख्येत नेहमीप्रमाणे याही वेळेस गावं वंचित आहेत.”

“दरवर्षी 1000 नव्या शिक्षकांना प्रशिक्षण द्या, म्हणजे पालकांचा खासगी शाळांकडील कल कमी होईल”

“शिक्षकांची जबरदस्त इच्छाशक्ती संख्येतील कमकुवतपणा भरुन काढत असली, तरी ग्रामीण शिक्षण संस्थेला साजेल असा बदल गरजेचं आहे. म्हणून डिसले गुरुजी यांना अध्यक्ष स्थानी बसवून राज्य सरकारने “शिक्षण सुधारणा समिती” घटीत करावी. त्यात मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील उत्कृष्ट शिक्षक सामील करावे. त्यातून दरवर्षी 1000 नव्या शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे. यामुळे पालकांचा खासगी शिक्षण संस्थाकडील कल कमी होईल. सोबतच सरकारी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

अरे व्वा..! जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान

जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर : दत्तात्रय भरणे

‘राज्याला आपला अभिमान’, डिसले गुरुजींच्या पाठीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप

संबंधित व्हिडीओ :

Demand of Maharashtra Bhushan Award for Disale Guruji by daughter of Shivsena MLA