मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र खेदजनक, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Oct 13, 2020 | 5:28 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर दुर्दैवी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीये.

मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र खेदजनक, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
cm uddhav thackeray- devendra fadnavis
Follow us on

जळगाव : राज्यपालांना प्राप्त होणारी निवेदने राज्यपाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्याचप्रमाणे मंदिरं उघडण्यासाठीची निवेदन देखील राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर दुर्दैवी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra fadanvis Criticized CM Uddhav Thackeray on his reply Bhagatsinh Koshyari)

राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलं. या पत्रव्यवहारावरुन आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

दीर्घ लॉकडाऊननंतर आता मुख्यमंत्र्यांनी पुनश्च हरीओमचा नारा दिलाय. त्यानुसार राज्यात आता जवळपास सगळं सुरु झालंय. राज्यात मदिरालये सुरु होतात पण मंदिरे नाही ही खेदाची बाब आहे, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं.

राज्य सरकारने मदिरालये आणि बार सुरु केलेत. इतकेच नव्हे तर पर्यटन विभागाच्या पत्राचा आधार घेत वेळ देखील वाढवून दिला. तर मग मंदिरांचे एवढे वावडे का?, असा सवाल विचारत देशातील इतर राज्यात देखील मंदिरे सुरु आहेत. मंदिरामुळे कोरोना वाढला असं चित्र नाही, असं फडणवीस म्हणाले.

मंदिरांमुळे केवळ भाविकांचीच आभाळ होते असं नाही तर त्याचा छोट्या व्यावसायिकांनाही फटका बसतो. त्यामुळे सरकारला सुबुद्धी मिळो आणि लवकरात लवकर मंदिरं उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, असं ते म्हणाले. या तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारी शिवसेना देखील आहे. त्यांच्या राज्यात इतका मोठा अन्याय का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरुन भाजपनं जोरदार टीका केलीय. ‘तुम्ही राज्यात सर्व काही सुरु केलं. दारुची दुकानंही सुरु केली. पण मंदिरं सुरु केली नाहीत. अशावेळी तुम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही तर कुणाला आहे?’ असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे? त्यांना नेमकं काय करायचं आहे? कोरोना हा मंदिरात दबा भरून बसला आहे का? मंदिरात गेलेल्या माणसावर कोरोना हल्ला करतो का?, विमानातून, एसटी आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही का?, असा खडा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. मंदिरं न उघडणं हा मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा असल्याची टीकाही पाटील यांनी केलीय.

मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना तोडीस तोड प्रत्युत्तर

माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सुनावलं.

(Devendra fadanvis Criticized CM Uddhav Thackeray on his reply Bhagatsinh Koshyari)

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे

महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई: प्रकाश आंबेडकर

उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे

बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणणं बंद केलं, उद्धव ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याचीच गरज : चंद्रकांत पाटील