महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 10 हजार कोटी रुपये द्या, नितीन राऊत यांची केंद्राकडे मागणी

| Updated on: Jul 02, 2020 | 10:29 PM

महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्राकडे 10 हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे (Nitin Raut demand economic help).

महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 10 हजार कोटी रुपये द्या, नितीन राऊत यांची केंद्राकडे मागणी
Follow us on

मुंबई : कोविड-19 मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडलं आहे. त्यामुळे तत्काळ 10 हजार कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांना केली आहे (Nitin Raut demand economic help from Central Government). याबाबत त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून मागणी केली.

नितीन राऊत यांनी या पत्रात म्हटलं, “राज्यात मागील 3 महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे महावितरणला फार मोठ्या व अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या काळात राज्यातील बहुतांश उद्योगधंदे व व्यवसाय बंद राहिले. त्यामुळे त्यातून मिळणारा महसूल ठप्प झाला. शेतीपंपाना आणि घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करुन दिल्याने प्रचंड आर्थिक तूट निर्माण झाली.”

“जवळपास 60 टक्के महसूल औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांकडून प्राप्त होत असतो. घरगुती व शेतीपंपाना सरासरी वीज पुरवठ्याच्या दरापेक्षा खूप कमी दराने वीज उपलब्ध करुन देण्यात आली. याची भरपाई औद्योगिक व वाणिज्य प्रकारातील ग्राहकांकडून करण्यात येते. याशिवाय ग्राहकांना वीज बील अदा करण्यासाठी मुदतवाढ दिल्याने दैनंदिन खर्च भागविणे सुद्धा अशक्य झाले आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी केंद्राच्या मदतीशिवाय कोणताच मार्ग उरलेला नाही,” असं नितीन राऊत यांनी सांगितले.

“महावितरण अभूतपूर्व आर्थिक संकटात”

नितीन राऊत म्हणाले, “लॉकडाउन कालावधी दरम्यान जवळजवळ सर्व औद्योगिक आणि व्यावसायिक विजेचा वापर बंद होता. सर्व ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशाप्रकारे, एप्रिल आणि मे मध्ये महसूल वसुली जवळपास थांबली. त्यात वीज खरेदी खर्च (प्रामुख्याने स्थिर), कर्मचाऱ्यांचे पगार, कराचे उत्तरदायित्व कमी झाले नाही. परिणामी, महावितरणला अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एप्रिल 2020 पासून महावितरणला वीज खरेदीचे देयके अदा करणे अवघड झाले आहे.”

“एप्रिल 2020 ते जून 2020 या काळात लॉकडाऊनचा फार मोठा विपरीत परिणाम झाला. तरीही पुढील काही महिन्यांपर्यंत किंवा संपूर्ण वर्षभर त्याचा वाईट प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. लॉकडाउन कालावधीत सर्वसाधारण जनता, लघु उद्योग आणि लहान दुकानदारांची आर्थिक स्थिती खालावली आहे. ती सावरण्यास काही वेळ लागेल. महसूल कमी प्रमाणात मिळाल्याने महावितरणला आपला दैनंदिन कारभार चालविणे फारच कठीण झाले आहे,” असंही नितीन राऊत यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

पुण्यात महिनाभरात तब्बल 32 हजार परप्रांतिय मजूर, नागरिक दाखल, मेट्रोच्या कामावर 1 हजार मजूर

Lockdown Extended | ठाणे, नवी मुंबई, बीड, राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन?

राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकऱ्यांना जुलैअखेरपर्यंत कर्जमाफी, सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा

Nitin Raut demand economic help from Central Government