बळीराजाचा संयम सुटला; शेतकऱ्यांची येत्या 8 डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक

| Updated on: Dec 04, 2020 | 6:18 PM

गेल्या नऊ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. (Farmer leaders call for Bharat Bandh on 8 Dec)

बळीराजाचा संयम सुटला; शेतकऱ्यांची येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या नऊ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. नऊ दिवस झाले तरी सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. (Farmer leaders call for Bharat Bandh on 8 Dec)

गेल्या नऊ दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. पण सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. सरकार आम्हाला कमी लेखत आहे, असा संताप व्यक्त करतानाच सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध म्हणून येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

कृषी कायदा रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकरी अत्यंत आक्रमक झाले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला. सरकार कायद्यात दुरुस्ती करण्यास तयार आहे. एमएसपीवर कायदा बनवायलाही सरकार तयार आहे. पण आम्हाला हा कायदाच नकोय. हा कायदा रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे आम्ही सर्वानुमते 8 डिसेंबर रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला असून देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.

शेतकरी आंदोलनाविरोधात कोर्टात याचिका

गेल्या नऊ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्याविरोधात ऋषभ शर्मा नावाच्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नवी दिल्ली आणि नोएडा परिसरात कोरोनाचा धोका असल्याने शेतकऱ्यांना आंदोलन संपवायला सांगा, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकेत काय म्हटलंय

  • शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाल्याने कोरोनाच्या कम्युनिटी स्प्रेडचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ हटविण्यात यावे.
  • आंदोलक शेतकऱ्यांनी रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे एमर्जन्सी/ मेडिकल सर्व्हिसला अडचणी निर्माण होत आहेत.
  • दिल्लीतील मोठ्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी लोक दिल्लीत येतात. या आंदोलनामुळे त्यांना रुग्णालयात जाण्यास अडचणी येत आहेत.
  • 26 नोव्हेबरला दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना बुराडी निरंकारी मैदानावर शांततेत आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. मात्र, शेतकऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे.

उद्याच्या बैठकीकडे लक्ष

उद्या 5 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधी दरम्यान बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, दिल्ली-गाजीपूर बॉर्डरवर तिन्ही कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उद्या शनिवारी अंतिम फैसला झाला नाही तर दिल्लीतील रस्ते बंद करण्यात येईल. तसेच दिल्लीतील भाजीपाला आणि खाद्यपदार्थ विक्रीची दुकानेही बंद करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (Farmer leaders call for Bharat Bandh on 8 Dec)

काय आहेत मागण्या?

  • केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करा
  • कृषी कायद्यातील इंटर-स्टेट इंट्रा-स्टेट व्यवसायाला विरोध
  • इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगद्वारे शेतमाल विक्रीला परवानगी देण्यास विरोध
  • या कायद्यामुळे कृषा बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. शेतकऱ्यांना एमएसपी मिळणार नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं.
  • वन नेशन वन मार्केट नव्हे तर, वन नेशन वन एमएसपी असावी अशी शेतकऱ्यांची मागणी
  • कृषी कायद्यात शेतीशी संबंधित सर्व जोखीम शेतकऱ्यांवर टाकण्यात आली आहे. त्यालाही शेतकऱ्यांचा विरोध आहे.
  • या कायद्याद्वारे प्रायव्हेट कार्पोरेट हाऊसेसकडून शोषण होण्याची शेतकऱ्यांची भीती (Farmer leaders call for Bharat Bandh on 8 Dec)

 

संबंधित बातम्या:

भाजपला शेतकरी आंदोलनाचा झटका; हरियाणात खट्टर सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची काँग्रेसची घोषणा

हम करे सो कायदा’ चालणार नाही, पंजाबच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला झुकवले; शिवसेनेचा हल्लाबोल

शेतकऱ्यांचा बाणेदारपणा, सरकारचं जेवण नाकारलं; म्हणाले, ‘आम्ही आमचं जेवण सोबत आणलंय’