FARMER PROTEST | राहुल गांधींसह विरोधी पक्षाचे 5 बडे नेते राष्ट्रपतींना भेटणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विविध विरोधी पक्षाचे 5 नेते राष्ट्रपतींना भेटणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे.

FARMER PROTEST | राहुल गांधींसह विरोधी पक्षाचे 5 बडे नेते राष्ट्रपतींना भेटणार
| Updated on: Dec 08, 2020 | 4:43 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात आता विरोधी पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणि आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दिल्यानंतर आता विरोधी पक्षाचे 5 मोठे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. (Five senior leaders of the Opposition will meet President Ramnath Kovind tomorrow)

मार्क्सवादी कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते सीताराम येचुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह हे विरोधी पक्षाच्या नेते राष्ट्रपतींना भेटणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फक्त 5 जणांनाच भेटीची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह अजून दोन नेते राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जाणार आहे. स्वत: सीताराम येचुरी यांनीच ही माहिती दिली आहे.

यापूर्वी शरद पवार हे काही नेत्यांना सोबत घेऊन राष्ट्रपदी रामनाथ कोविंद यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली होती. पण या नेत्यांमध्ये राहुुल गांधी यांचा समावेश असेल की नाही, याबाबत स्पष्टता नव्हती. आज अखेर सीताराम येचुरी यांनी राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे 5 नेते राष्ट्रपती कोविंद यांना भेटणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘त्या’ पत्रांवरुन शरद पवार निशाण्यावर

शरद पवार यांनी आपल्या कृषी मंत्रिपदाच्या कार्यकाळात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यातील शिला दीक्षित यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवत रविशंकर प्रसाद यांनी पवारांवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. तेव्हा पवार यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कृषी कायद्यात बदल गरजेचा असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर खासगी गुंतवणूक आणि शेतकऱ्यांना आपलं उत्पादन कुठेही विकण्याचा अधिकार मिळावा असं लिहिण्यात आलं होतं.

त्याचबरोबर शरद पवार यांना 2005 मध्ये एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचा आणि त्यावर पवारांनी दिलेल्या उत्तराचा दाखलाही प्रसाद यांनी दिला. अॅग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट अॅक्ट कधी संपणार? असा तो प्रश्न होता. आणि त्यावर सहा महिन्यात परिणाम दिसतील आणि मार्केट अॅक्टमध्ये सुधारणा केली नाही तर भारत सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार नाही, असं उत्तर पवारांनी दिल्याची आठवण प्रसाद यांनी करुन दिली आहे.

Five senior leaders of the Opposition will meet President Ramnath Kovind tomorrow