नवी दिल्ली: कामगारासांठी पहिल्यांदा मुंबई रोखण्याची धमक असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस (George Fernandes) यांचं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. आज सकाळी सात वाजता राजधानी दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस यांना स्वाईन फ्लू झाला होता, असं सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते. त्यांनी 2009 ते 2010 पर्यंत राज्यसभा सदस्यपद भूषवलं.
लढवय्या आणि बेडर, निश्चयी पण मितभाषी, स्पष्ट वक्तेपणा आणि मस्त कलंदर व्यक्तीमत्त्व अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती. कामगारासांठी पहिल्यांदा रेल्वेचा देशव्यापी ऐतिहासिक संप जॉर्ज फर्नांडिस यांनीच पुकारला होता.
जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिग्ग्जांनी ट्विटरवरुन लढवय्या नेते जॉर्ज फर्नांडिस यांना अखेरचा सलाम केला.
George Sahab represented the best of India’s political leadership.
Frank and fearless, forthright and farsighted, he made a valuable contribution to our country. He was among the most effective voices for the rights of the poor and marginalised.
Saddened by his passing away.
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2019
जॉर्ज फर्नांडिस यांचा अल्पपरिचय
कामगारांसाठी देश ढवळून काढणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म 3 जून 1930 रोजी झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आई-वडिलांनी त्यांना रोमन कॅथलिक धर्मगुरु होण्यासाठीचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. मात्र, अन्यायग्रस्तांबद्दल मनात आपुलकी असणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांनी वयाच्या 19 व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधली. सार्वजनिक जीवनातील ही त्यांची पहिली एन्ट्री. त्यानंतर पुढे 1949 मध्ये जॉर्ज मुंबईत आले. मुंबईतील जॉर्ज यांचा प्रवास अत्यंत खडतर राहिला. पुत्रे डिमेलो आणि राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात आले आणि जॉर्ज यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. पुढे ते कामगारांसाठी झपाटल्यासारखे काम करु लागले. एका घोषणेत मुंबई ठप्प करणारा नेता म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख आहे.
1967 साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा जॉर्ज यांनी संसदेत प्रवेश केला. या मतदारसंघातून त्यांनी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांना पराभूत केले होते. मात्र, 1971 मध्ये जॉर्ज पराभूत झाले. पुढे इंदिरा गांधी यांना त्यांनी कडाडून विरोधही केला. आणीबाणीच्या काळात जॉर्ज यांनी तुरुंगवासही भोगला. भारतीय रेल्वेचा इतिहासातील पहिला आणि एकमेव संप जॉर्ज फर्नांडिस यांनी 1974 साली केला.
जॉर्ज फर्नांडिस यांची धगधगती कारकीर्द
1930 – 3 जून 1930 रोजी कर्नाटकातील मंगळुरू इथं जन्म
1949 – कर्मभूमी मुंबईत प्रवेश
1967 – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते स. का. पाटील यांना पराभूत करुन खासदार म्हणून विजयी
1971 – लोकसभा निवडणुकीत पराभव
1974 – स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे संप
1977 – मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये उद्योगमंत्रीपदाची जबाबदारी
जुलै 1979 – लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण, मात्र दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त करुन मंत्रिमंडळातून राजीनामा
1984 – मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव
1989 – बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर लोकसभेवर
विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वातील संयुक्त आघाडी सरकारमध्ये रेल्वेमंत्री
1991 – लोकसभा निवडणुकीत मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय.
1994 – बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.
1996 – लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती, फर्नांडिस बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय
1999 – फर्नांडिस यांचा समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा नवा पक्ष अस्तित्वात
1998 – अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये संरक्षणमंत्री
2001 – ऑक्टोबर 2001 मध्ये त्यांची पुन्हा संरक्षणमंत्रीपदी नेमणूक
2004 – जॉर्ज फर्नांडिस यांनी बिहार राज्यातील मुझफ्फरपूर मतदारसंघातून फर्नांडिस विजयी
2009 – लोकसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) पक्षाने तिकीट नाकारले, म्हणून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली