पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात (Ganesh Festival starting) भाऊसाहेब रंगारी की लोकमान्य टिळकांची? हा वाद चर्चिला जातो. मात्र ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस (Shripal Sabnis) यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद काही जातीयवादी लोक करत असल्याचं म्हटलंय. भाऊसाहेब रंगारी (Bhausaheb Rangari) यांचा गणपती (Ganesh Festival starting) पुण्यापर्यंतच मर्यादित राहिला, तर टिळकांचा (Lokmanya Tilak) गणपती देशात पोहोचला. रंगारी हे गणपती संस्थापक, तर लोकमान्य टिळक प्रसारक होते. यामध्ये कोणताही वाद नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
श्रीपाल सबनीस पुण्यात भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट अखंड हिंदुस्थानातील गणेशोत्सवातील छायाचित्र ग्रंथाच्या अनावरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही हजेरी लावून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम एस बिट्टा यांचीही हजेरी होती.
यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी भाऊसाहेब रंगारी बहुजन आणि लोकमान्य टिळक ब्राह्मण असा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद काही जातीयवादी लोक करत असल्याचा आरोप केला.
राष्ट्रीय एकात्मता आणि एकसंध समाज निर्मिती हा गणेशोत्सवाचा गाभा असल्याचं लोकमान्य टिळकांनी सांगितलं, असं मुक्ता टिळक म्हणाल्या. गणेशोत्सवाचा मूळ हेतू राष्ट्रीय आणि सामाजिक एकोप आहे. मात्र याला काहीजण गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असून याला आपण खतपाणी घालू नये. बिनबुडाचे वाद समाजात निर्माण न करता उत्सव सशक्तपणे करण्याचं आवाहन त्यांनी केलं.