तब्बल 10 वर्षांनी वरळीतील ‘गीता’ टॉकीज सुरु, पहिला शो ‘ठाकरे’
मुंबई : राज्यभर आज ‘ठाकरे’ सिनेमाचाच बोलबाला आहे. पहाटे 4.15 वाजता वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरला ठाकरेचा पहिला शो सुरु झाला आणि बघता बघता फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी राज्यभरातील थिएटर फुल्ल झाले. शिवसैनिकांसह सर्वसामान्य सिनेरसिकांनीही ‘ठाकरे’साठी रांग लावली. या सिनेमाच्या निमित्ताने वरळीत काहीशी हटके आणि आनंदाची घटना घडली. वरळीतील ‘गीता टॉकीज’ गेल्या 10 वर्षांपासून बंद होतं. […]
मुंबई : राज्यभर आज ‘ठाकरे’ सिनेमाचाच बोलबाला आहे. पहाटे 4.15 वाजता वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरला ठाकरेचा पहिला शो सुरु झाला आणि बघता बघता फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी राज्यभरातील थिएटर फुल्ल झाले. शिवसैनिकांसह सर्वसामान्य सिनेरसिकांनीही ‘ठाकरे’साठी रांग लावली. या सिनेमाच्या निमित्ताने वरळीत काहीशी हटके आणि आनंदाची घटना घडली.
वरळीतील ‘गीता टॉकीज’ गेल्या 10 वर्षांपासून बंद होतं. काही दुरुस्तीच्या आणि अन्य कारणांनिमित्त हे टॉकीज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आज म्हणजे 25 जानेवारी रोजी नूतनीकरणानंतर गीता टॉकीज पुन्हा सुरु करण्यात आलं. विशेष म्हणजे, गीता टॉकीज सुरु झाल्यानंतर, इथे पहिला सिनेमा लावण्यात आला तो म्हणजे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा. त्यामुळे अर्थात, उपस्थितांमध्येही एक वेगळाच उत्साह दिसून आला.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची निर्मिती, मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांचं दिग्दर्शन आणि अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) यांनी साकारलेली बाळासाहेबांची व्यक्तिरेखा पाहण्याची उत्सुकता अवघ्या मराठी जनांना आहे.अभिनेत्री अमृता राव हिने माँसाहेबांची अर्थात बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने मानापमान नाट्य रंगलं. दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र हे सर्व मागे सोडत आज ठाकरे सिनेमा प्रदर्शित झाला आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत बहुतेक ठिकाणी शिवसैनिकांनी ढोलताशांच्या गजरात या सिनेमाचं स्वागत केलं.
ठाकरे सिनेमा आणि वाद-चर्चा वगैरे
- ठाकरे सिनेमावरुन पहिली काहीशी नकारात्मक चर्चा सुरु झाली ती सिनेमात बाळासाहेबांसाठी वापरण्यात आलेल्या आवाजावरुन. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजावर अनेकांनी सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षातही नापसंती दर्शवली होती.
- संभाजी ब्रिगेड या संघटनेने ठाकरे सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. छत्रपती संभाजी महाराज यांची सिनेमात बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता.
- ठाकरे सिनेमातील ‘हटाव लुंगी’ या शब्दांवरुन सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. या शब्दांमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असे मत सेन्सॉर बोर्डाने मांडला. त्यानंतर ‘उठाव लुंग’ असे बदल या शब्दांमध्ये सिनेमात करण्यात आले.
- ठाकरे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या अर्ध्यातून निघून जाण्यावरुन नाराजीनाट्य पाहावयास मिळाले. त्यावरुन 23 आणि 24 जानेवारीला उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मात्र, गर्दी असल्याने आपण माघारी गेलो, असे समजुतीचे स्पष्टीकरण अभिजीत पानसे यांनी दिले आणि वाद मिटला.