मान्सून सुरु होण्यापूर्वी तरी मदत द्या, गुहागरमधील कोळी बांधव-बागायतदार रडकुंडीला

| Updated on: Jun 07, 2020 | 3:01 PM

शासनाने लगेच पंचनामा करुन आम्हाला उभे राहण्यासाठी मदत करावी अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. (Guhagar Residents seek help for damage by Cyclone Nisarga)

मान्सून सुरु होण्यापूर्वी तरी मदत द्या, गुहागरमधील कोळी बांधव-बागायतदार रडकुंडीला
Follow us on

गुहागर : ‘निसर्ग’ चक्रीवादळात गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांनी बांधलेली घरे जमीनदोस्त झाली. सरकारकडून सर्वांना मदत मिळण्यास विलंब होत असल्यामुळे मान्सून सुरु होण्यापूर्वी तरी आम्हाला मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Guhagar Residents seek help for damage by Cyclone Nisarga)

“जवळपास 4 दिवस झाले. आमचं एवढं नुकसान झालं, मात्र साधी विचारपूस करण्यासाठी कोणी राजकीय नेता किंवा लोकप्रतिनिधी आला नाही” असा दावा करत कोळी बांधवांसह समुद्र किनाऱ्यावरील बागायतदारांनी आपली खंत व्यक्त केली.

निसर्ग चक्रीवादळ नुकसानभरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 75 कोटी रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तात्काळ मदत जाहीर केल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ज्या बागेवर आम्ही संपूर्ण वर्ष आमचं कुटुंब पोसतो, तीच बाग आज नष्ट झाल्याने आम्ही जगायचं कसं असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शासनाने लगेच पंचनामा करुन आम्हाला उभे राहण्यासाठी मदत करावी अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.

हेही वाचा : कपड्यांसाठी 1800, भांड्यांसाठी 2 हजार, घरांसाठी 95 हजार, वादळग्रस्तांसाठी उद्यापासून थेट मदत!

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर या समुद्रकिनारी असलेल्या सर्वच गावात बिकट स्थिती आहे. समुद्र किनारी असलेली घरे व शेकडो एकर बागा या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे कोकणातील नागरिक ज्या बागायतीवर आपलं पोट भरतात त्या आता पुन्हा उभारणे गरजेचे आहे. (Guhagar Residents seek help for damage by Cyclone Nisarga)

या वादळात आमची होडी पूर्णपणे मोडल्याने आम्ही आता मासेमारीही करु शकत नाही. शासन आम्हाला मदत करणार आहे की नाही असा सवाल येथील नागरिक करत आहेत

निसर्ग चक्रीवादळात 8 जण जखमी झाले आसून 11 जनावरांचे प्राण या दुर्घटनेत गेले. तर जवळपास 28 हजार घरांचे नुकसान झाले आहे. 3200 पेक्षा जास्त झाडे पडली असून जवळपास 4 हजार विजेचे पोल पडले आहेत. या सर्व गावात युद्धपातळीवर काम सुरु असून स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने अनेक ठिकाणी झालेली पडझड दूर करण्यात येत आहे.