येडियुरप्पा आणि फडणवीसांना फोन, पूर हटवण्यासाठी कोल्हापूरचे जावई सक्रिय

| Updated on: Aug 08, 2019 | 4:28 PM

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि येदियुरप्पा या दोघांनाही फोन केल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली.

येडियुरप्पा आणि फडणवीसांना फोन, पूर हटवण्यासाठी कोल्हापूरचे जावई सक्रिय
Follow us on

कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापुरातील पूर हटवण्यासाठी केंद्र सरकारही सक्रिय झालंय. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी घेतलाय. हा विसर्ग दोन लाखांहून पाच लाख करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि येडियुरप्पा या दोघांनाही फोन केल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली.

कोल्हापूरचे जावई अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन सर्व प्रकारचं सहाय्य करण्याचं आश्वासन दिलंय. अलमट्टी धरणातून पुढे विसर्ग वाढवल्यास सांगलीतील पाणी कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्राच्या विनंतीवरुनच कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

एअरलिफ्ट करणार

“जिथे लोक अडकले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व ती मदत केली जात आहे. नेव्हीच्या 5 टीम, एनडीआरफ 2, एचडीआरएफ 2 मदतकार्य करत आहेत. सांगलीसाठी आणखी 5 टीम मागवल्या आहेत. अडचणीच्या ठिकाणी एअरलिफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. सर्वच ठिकाणी एअरलिफ्ट करणं शक्य होणार नाही. जिथे दुसरा उपाय नाही तिथे ते केलं जाईल. त्याची तयारी आम्ही केली आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सांगली दुर्घटना

ग्राम पंचायतीने लोकांना वाचवण्यासाठी बोट पाण्यात उतरवली. त्या बोटीत 30-35 जण होते. दुर्दैवाने त्या बोटीच्या इंजिनमध्ये फांदी अडकल्याने बोटीचा बॅलन्स गेला आणि बोट उलटली. त्यातील 15 लोक बचावले. मला मिळालेल्या माहितीनुसार 9 मृतदेह हाती लागले आहेत, आणखी 2-3 बुडाल्याचं कळतंय. पण अधिकृत आकडा नाही. सध्यस्थितीला बचावकार्याला प्राधान्य आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे

  • सांगलीतील पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे, हवामानामुळे तिथे पोहोचता न आल्याने दौरा रद्द करावा लागला. बोटींची संख्या वाढवून लोकांना मदत करु, काही ठिकाणी एअरलिफ्ट करु.
  • 223 गावं पुराने बाधित आहेत, 18 गावांना पूर्ण वेढा आलाय, 28 हजार लोकं बाधित, 8 हजारपेक्षा जास्त लोकांना स्थलांतरित केलं, 97 हजार लोक स्वत:हून स्थलांतरित झाली. 152 ठिकाणी 38 हजार लोक विविध कॅम्पमध्ये आहेत.
  • 7 बोटी आहेत, आणखी मागवल्या आहेत, देशभरात उपलब्ध असलेली सामुग्री कोल्हापूर आणि सांगलीत मागवली आहे.
  • 3800 घरांची पडझड झालीय, 89 घरं पूर्णत: बाधित आहेत, चिखली आणि आंबेगावात जास्त नुकसान झालंय, राज्य सरकार सर्वांना मदत करेल, जीआरमध्येही बदल केला आहे, शक्य ती सर्व मदत करु, मृतांच्या वारसांना 5 लाख मदत केली जाईल.
  • 390 पाणी योजना बंद कराव्या लागल्या आहेत. पुरामुळे त्या बंद असून सुरु करणार आहोत, 2 लाखापेक्षा जास्त घरातील वीज गेलीय आहे.
  • कोल्हापुरातील 67 हजार हेक्टर शेतीचं नुकसान, पेट्रोल-डिझेलची टंचाई आहे, ज्या भागात बचावकाम सुरु आहे तिथे ते देऊ, राष्ट्रीय महामार्ग उघडला तर ही टंचाई कमी होईल, पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा सुरु आहे
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांनी येडियुरप्पा आणि माझ्याशी चर्चा केली, दोन्ही राज्यात समन्वय सुरु आहे.
  • गिरीश महाजन हे सांगलीत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, सुभाष देशमुखही पोहोचतील, साताऱ्यात विजय शिवतरे आहेत, माझी यात्रा रद्द केली आहे, दुसऱ्या टप्प्यात 18 तारखेनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊन
  • पुरामुळे लेप्टोस्पायरोसिस हा रोग पसरण्याची शक्यता आहे, ती औषधं आवश्यक तिथे दिली आहेत, मुंबईतील डॉक्टरही पाठवू, आरोग्याच्या दृष्टीने आम्ही सर्व यंत्रणेसह सज्ज आहोत.
  • काही भागात 2 महिन्याचा पाऊस 7 दिवसात पडला, त्यामुळे पुरावरुन राजकारण करण्याची गरज नाही.
  • कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या विनंतीवरुनच घेतला, आधी 2 लाख क्यूसेकने विसर्ग सुरु होता, तो कर्नाटकने 5 लाखांपर्यंत वाढवला आहे.