मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि तिकीट बुकिंग, रेल्वे प्रवाशांसाठी गृह मंत्रालयाची नियमावली जारी

| Updated on: May 11, 2020 | 4:45 PM

देशभरात लॉकडाऊन सुरु असताना 12 मेपासून म्हणजेच उद्यापासून दिल्ली येथून (Home Ministry issues standard operating procedures) रेल्वे सेवा सुरु केली जात आहे.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि तिकीट बुकिंग, रेल्वे प्रवाशांसाठी गृह मंत्रालयाची नियमावली जारी
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊन सुरु असताना 12 मेपासून म्हणजेच उद्यापासून दिल्ली येथून (Home Ministry issues standard operating procedures) रेल्वे सेवा सुरु केली जात आहे. दिल्ली रेल्वे स्थानकावरुन उद्या 15 रेल्वे गाड्या देशभरातील विविध शहरांसाठी रवाना होणार आहेत. या रेल्वे गाड्यांसाठी तिकीट बुकिंग आज संध्याकाळी 4 वाजेपसून सुरु झालं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. प्रत्येक प्रवाशाला या सूचनांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे (Home Ministry issues standard operating procedures).

केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रवाशांसाठी जारी केलेल्या सूचना :

  • ट्रेन कुठल्या मार्गाने आणि कधी जाईल, याबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेईल. यासाठी रेल्वे मंत्रालय केंद्रीय गृह आणि आरोग्य मंत्रालयाच्या संपर्कात राहील.
  •  ट्रेन सुटण्याची वेळ काय राहील, बुकींग कशाप्रकारे केलं जाईल, स्टेशन आणि ट्रेनमध्ये प्रवेश कसा करावा, याबाबतच्या गाईडलाईन्स रेल्वे मंत्रालय जारी करेल.
  • ज्यांचं ई-तिकीट कन्फर्म झालं आहे त्यांनाच रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळेल.
  •  प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी केली जाईल. यात ज्याची प्रकृती स्थिर आणि ठीक असेल त्यांनाचा प्रवासाची परवानगी दिली जाईल.
  •  प्रत्येक रेल्वे स्थानकावर, फलाटावर हँड सॅनिटायझरची सुविधा असावी.
  •  ट्रेनमधून प्रवास करताना आणि रेल्वे स्थानकावर उभं असतानाही प्रवाशांनी मास्क वापरणं अनिवार्य आहे.
  •  ट्रेन चढताना आणि उतरताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जावं.
  • रेल्वे मंत्रालयाच्या नियमावलीचं रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी तंतोतंत पालन करावं.
  •  ट्रेन जेव्हा शेवटच्या स्थानकावर पोहोचेल तेव्हा प्रत्येक प्रवाशाला त्या राज्यांच्या नियमांचं पालन करावं लागेल आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करावं लागेल.

दिल्लीहून 15 शहरांच्या दिशेला रेल्वे गाड्या रवाना होणार

रेल्वे विभाग 12 मेपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वेगाड्या सुरु करणार आहे. सुरुवातीला 12 मे रोजी देशभरातील 15 रेल्वे स्टेशनदरम्यान 15 गाड्या (30 फेऱ्या) सुरु होतील. या रेल्वे गाड्यांसाठी 11 मे रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग सुरु करण्यात आली आहे. रेल्वेच्या (irctc) अधिकृत वेबसाईटवर आणि अॅपवर यासाठी तिकीट बूक करता येणार आहे. यामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

12 मे रोजी सुरु होणाऱ्या रेल्वे गाड्या विशेष रेल्वे म्हणून सुरु होतील. या विशेष रेल्वे नवी दिल्ली (दिबरुगड), आगरताळा, हावरा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवी या 15 रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवासी वाहतूक करतील. त्यामुळे देशभरात अडकून पडलेल्या प्रवाशांना या ठिकाणांहून आपल्या गावाच्या दिशेने प्रवास करता येणार आहे.

कोरोना नियंत्रणासाठी देशभरात कोविड 19 केअर सेंटरसाठी 20 हजारहून अधिक रेल्वे डबे आरक्षित केले आहेत. या व्यतिरिक्त देशभरातील स्थलांतरित कामगारांच्या वाहतुकीसाठी ‘श्रमिक विशेष’ रेल्वे म्हणून जवळपास 300 रेल्वे सुरु करण्याचीही तयारी सुरु आहे. त्यामुळेच या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन अन्य मार्गांवर रेल्वे सुरु करण्याबाबत रेल्वे विभाग निर्णय घेणार आहे.

तिकीट बुक कसं करणार?

रेल्वे विभागाची अधिकृत वेबासाईट https://www.irctc.co.in/ वर कुणालाही तिकीट बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या काऊंटर होणारी गर्दी लक्षात घेते देशभरातील रेल्वे काऊंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. अगदी प्लॅटफॉर्म तिकिट देखील ऑनलाईनच घ्यावं लागणार आहे. त्यासाठीही रेल्वे स्टेशनवर व्यवस्था नसेल.

ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असणार आहे त्यांनाच रेल्वे स्टेशनवर प्रवेश दिला जाणार आहे. प्रवाशांना चेहऱ्याचा मास्क बंधनकारक असणार आहे. तसेच रेल्वे प्रवासाला सुरुवात होण्याआधी प्रत्येक प्रवाशाची तपासणी देखील होणार आहे. कोरोनाची लक्षण नाही अशाच प्रवाशांना प्रवासाला परवानगी मिळणार आहे. सुरु होणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक लवकरच रेल्वे विभागाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

PM Modi Video Conference Live Update | पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरु, अमित शाहही सहभागी