कोकणात माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती, भूस्खलनाच्या घटनेत वाढ

| Updated on: Aug 11, 2019 | 2:33 PM

राज्यातील अतिवृष्टीचा फटका कोल्हापूर सांगलीसह कोकणालाही बसला आहे. या पूरपरिस्थितीनंतर आता सिंधुदुर्गमध्ये नवं संकट उभं ठाकलं आहे.

कोकणात माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती, भूस्खलनाच्या घटनेत वाढ
Follow us on

सिंधुदुर्ग : राज्यातील अतिवृष्टीचा फटका कोल्हापूर सांगलीसह कोकणालाही बसला आहे. या पूरपरिस्थितीनंतर आता सिंधुदुर्गमध्ये नवं संकट उभं ठाकलं आहे. गेल्या चार दिवसात दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीमध्ये रस्ता खचणे किंवा डोंगर कोसळले यासारखे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे कोकणात भूस्खलनाची भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर सांगली बरोबर सध्या कोकण ही पूरपरिस्थितीशी सामना करत आहे. कोकणातील पूर आटोक्यात आला असला तरी तळ कोकणात आता नवं संकट उभं राहिलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. त्याशिवाय गेल्या दोन दिवसात कणकवली मध्ये तिवरे कुडाळ या ठिकाणच्या सरंबळ, आकेरी सावंतवाडीत आंबोली तर दोडामार्ग मध्ये झोळंबे गावामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत.

तसेच दोडामार्गातील काही भागात सध्या खाण प्रकल्प सुरु आहेत. डोंगर पोखरून त्यातील खनिज उत्खनन सुरू असल्यामुळे पावसामध्ये त्या ठिकाणच्या गावांना चिखलाचा सामना सहन करावा लागतो. काही ठिकाणी तर रस्ते पूर्ण पणे उचकटले आहेत. रस्त्यांना भेगा पडल्या आहेत.

अतिवृष्टीमुळे डोंगरात पाणी साठा वाढल्याने हे डोंगर खचत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र रस्त्यांना भेगा पडण्याचे प्रमाण अचानक का वाढले आहे अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान प्रशासनाने या संदर्भात तपासणीकरिता भूभर्ग शास्त्रज्ञांना पाठवलं आहे

भूस्खलनामुळे लोक धास्तावले असून शासनाने तातडीने याची दखल घेऊन धोक्याच्या छायेतील लोकांना स्थलातरीत करण्याची गरज आहे. अन्यथा कोकणात माळीणची पुनरावृत्ती होऊ शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे.