आकाशातून आलेली वीज थेट गवताच्या वखारीवर..राज्यात अवकाळीचा धुमाकूळ,बुलढाण्यात वीज पडून 16 मेंढ्यांचा मृत्यू

| Updated on: Mar 06, 2023 | 11:42 AM

पालघर तालुक्यात आकाशातून पडलेली वीज थेट गवताच्या वखारीवर पडली. उन्हाने सुकलेल्या या वखारीने लगेच पेट घेतला आणि भीषण आग लागली.

आकाशातून आलेली वीज थेट गवताच्या वखारीवर..राज्यात अवकाळीचा धुमाकूळ,बुलढाण्यात वीज पडून 16 मेंढ्यांचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यात कालपासून अवकाळी पावसाला (Unseasonal rain) सुरुवात झाली आहे. 8 मार्चपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागात वीजेच्या कडकडाटासह गारपीटीची शक्यता हवामान विभागार्फे वर्तवण्यात आली होती. 7 मार्च रोजी रात्रीपासूनच राज्यातील अनेक भागात बदललेल्या हवामानाचा फटका बसला. काल सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. तर रात्रीतून काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. पालघर तालुक्यात आकाशातून पडलेली वीज थेट गवताच्या वखारीवर पडली. उन्हाने सुकलेल्या या वखारीने लगेच पेट घेतला आणि भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

कुठे घडली घटना?

पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागात असलेल्या साखरे येथील गवताच्या वखाऱ्याला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारात वीज पडून वखार जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वखार मालकाचे लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे.

बुलढाण्यात मेंढ्या दगावल्या

बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस बरसला. तर काही ठिकाणी विजा पडण्याच्याही घटना घडल्या. बुलढाण्याच्या शेजारी असलेले साखळी नावाच्या गावात वीज पडून मेंढपाळाच्या तब्बल 16 मेंढ्या दगावलेल्या आहेत. तर पाच ते सहा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. महसूल विभागाकडून सदर घटनेचा पंचनामा सुरू आहे .. मात्र मेंढपाळांचं मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये द्राक्ष, भाज्यांचं नुकसान

नाशिक शहर आणि जिल्ह्यात रात्रभर जोरदार अवकाळी पाऊस झाला. शहरात मध्यरात्री 2 वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र या अवकाळी पावसाने आता पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत आले असून, ग्रामीण भागात कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, द्राक्षे आणि कोबी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच आजच्या होळीच्या उत्सवावर देखील पावसाचे सावट आहे. आज आणि उद्या हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

अहमदनगरमध्ये गारपीट

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.. काही ठिकाणी गाराही पडल्या तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.. या अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे…आज सकाळी देखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळतय…

धुळ्यात 400 एकर पिकांचं नुकसानीचा अंदाज

धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे चारशे एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दोन तालुक्यात सुमारे साठ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काल झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिदखेडा या दोन्ही तालुक्यात रब्बी पिकांना त्याचा फटका बसला आहे.