7 मार्चला लग्न होतं, वडील पत्रिका वाटत असताना मुलगा शहीद झाल्याची बातमी आली

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत. शनिवारी एलओसीवर राजौरी जिल्ह्यातील नौसेरा सेक्टरमध्ये आयईडी डिफ्यूज करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट शहीद झाले. 31 वर्षीय चित्रेश यांचा पुढच्या महिन्यात 7 तारखेला विवाह होता. उत्तराखंडमधील पोलीस निरीक्षकाचे ते चिरंजीव आहेत. या घटनेत मेजर चित्रेश सिंह यांच्यासह आणखी एक जवान […]

7 मार्चला लग्न होतं, वडील पत्रिका वाटत असताना मुलगा शहीद झाल्याची बातमी आली
Follow us on

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत. शनिवारी एलओसीवर राजौरी जिल्ह्यातील नौसेरा सेक्टरमध्ये आयईडी डिफ्यूज करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट शहीद झाले. 31 वर्षीय चित्रेश यांचा पुढच्या महिन्यात 7 तारखेला विवाह होता. उत्तराखंडमधील पोलीस निरीक्षकाचे ते चिरंजीव आहेत. या घटनेत मेजर चित्रेश सिंह यांच्यासह आणखी एक जवान जखमी झाला. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

नौसेरा सेक्टरमध्ये आयईडी लावल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हा आयईडी डिफ्यूज केला जात होता. तीन आयईडी यशस्वीपणे डिफ्यूज करण्यात आले. पण चौथा आयईडी डिफ्यूज करताना स्फोट झाला. या घटनेत अभियांत्रिकी विभागाचे मेजर चित्रेश बिष्ट शहीद झाले. यापूर्वी चित्रेश यांनी 15 ऑगस्टला 15-18 आयईडी डिफ्यूज केले होते.

चित्रेश हे भारतीय सैन्य अकादमीतून साल 2010 साली देहरादूनहून पासआऊट झाल्याची माहिती आहे. चित्रेश यांचे पिता एसएस बिष्ट उत्तराखंडमधील रानीखेत पिपली गावचे रहिवासी आहेत. 7 मार्चला मुलाचं लग्न असल्यामुळे ते लग्नाच्या पत्रिका वाटत होते. त्यातच आपला मुलगा शहीद झाल्याची बातमी त्यांना समजली. शहीद चित्रेश बिष्ट यांचं पार्थिव रविवारी देहरादूनला येण्याची शक्यता आहे. या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

3 फेब्रुवारीला सुट्टी संपवून चित्रेश कर्तव्यावर परतले होते. यापूर्वी मध्य प्रदेशातील महू इथे त्यांनी प्रशिक्षणही घेतलं होतं. 28 फेब्रुवारीपासून चित्रेश लग्नाच्या सुट्टीवर येणार होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं, तसंच आपण बिष्ट कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचं सांगितलं.

पाकिस्तानप्रेरित दहशतवाद्यांचा धुडगूस काश्मीर घाटीत सुरुच आहे. 14 फेब्रुवारीलाच पुलवामामध्ये झालेल्या आत्मघातकी स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश शोकसागरात आहे. पाकिस्तानचा देशभरात निषेध केला जातोय. त्यातच पुन्हा एकदा आयईडी ब्लास्टची घटना घडली आहे.