शर्मिला ठाकरे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर, ब्रम्हनाळमधून पाहणीची सुरुवात

| Updated on: Aug 14, 2019 | 9:48 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे कोल्हापूर-सांगली-साताऱ्यातील पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत. बोट दुर्घटना झालेल्या ब्रम्हनाळ गावातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

शर्मिला ठाकरे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर, ब्रम्हनाळमधून पाहणीची सुरुवात
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा (Kolhapur Sangli Flood) पाहणी दौरा करणार आहेत. शर्मिला ठाकरे सकाळी पुराचा तडाखा बसलेल्या सांगलीतल्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट देऊन दौऱ्याची सुरुवात करतील.

कोल्हापूर-सांगलीतील महापुराचं पाणी ओसरत असलं, तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा डोंगर कायम आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ येत आहे. बोट दुर्घटना झालेल्या ब्रम्हनाळ गावातून शर्मिला ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. शर्मिला ठाकरे सकाळी 11 वाजताच्या सुमारास ब्रम्हनाळ गावाला भेट देतील. ब्रम्हनाळ गावात झालेल्या बचावकार्यादरम्यान बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांना प्राण गमवावे लागले होते.

त्यानंतर, शर्मिला ठाकरे दुपारच्या सुमारास सांगलीतल्या पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन नुकसानाची पाहणी करतील. शर्मिला ठाकरे मिरज शहरातल्या कृष्णा घाट परिसरातील पूरग्रस्त लोकांचीही भेट घेणार आहेत. तसंच जनावरांच्या छावणीची पाहणी करणार आहेत.

पूरग्रस्त शिरोळ-टाकवडेला भेट

सांगली दौऱ्यानंतर त्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतील. कोल्हापुरात महापुराच्या विळख्यात अडकलेल्या शिरोळ, टाकवडे, इचलकरंजीतल्या पूरग्रस्तांची भेट त्या संध्याकाळी घेणार आहेत. त्यानंतर साताऱ्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करुन त्या मदत करणार आहेत.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सातारा, सांगली भागात जनजीवन उद्ध्वस्त  झालं आहे. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पाठवा, असं आवाहन मनसेच्या विविध शाखांतर्फे करण्यात आलं होतं.

राज्य सरकारसह सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरील अनेक गट आणि सर्वसामान्य नागरिकही पूरग्रस्तांना मदत करत आहेत. अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, रवी जाधव, कुशल बद्रिके, हार्दिक जोशी (राणादा), अभिजीत चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर यासारख्या मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर यासारख्या बॉलिवूडमधील मराठमोळ्या कलाकारांसह अमिताभ बच्चन, अक्षय कुमार अशा मोजक्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने सेलिब्रिटींचे कानही पिळले होते. तसंच मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

संबंधित बातम्या

पूरग्रस्तांसाठी ‘देव’ धावला, रहाणेपाठोपाठ सचिन तेंडुलकरकडून मदत

पूरग्रस्तांसाठी विलासरावांचा मुलगा धावला, रितेशकडून 25 लाखांची मदत

लानत है उनपे, जिनके पास दानत नहीं, पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बॉलिवूडला मनसेच्या कानपिचक्या

जाणिवा जीवंत असणारे रिअल हिरो, पूरग्रस्तांना मदतीचा हात