‘आमी आत्महत्या करायला तयार हाव… आवं काय, जगावं कसं बगा आमी?’, बळीराजाची व्यथा ऐकून संभाजीराजे हादरले

| Updated on: Oct 20, 2020 | 8:16 AM

खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना तेरणा नदीनं आपली वाट बदलल्यानं अख्ख्या शिवारातील माती वाहून गेल्याचं पाहायला मिळालं. तिथं असलेल्या बळीराजाची व्यथा ऐकून आपल्या हृदयाचा ठोका चुकल्याची भावना संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

आमी आत्महत्या करायला तयार हाव... आवं काय, जगावं कसं बगा आमी?, बळीराजाची व्यथा ऐकून संभाजीराजे हादरले
Follow us on

लातूर: ‘आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो काय, जगावं कसं बगा आमी?’ बळीराजाची ही व्यथा ऐकून हृदयाचा ठोका चुकल्यासारखं वाटलं, अशी भावना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. संभाजीराजे काल लातूर जिल्ह्यातील निलंगा परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. पावसानं दिलेल्या तडाख्यात पिकांचं प्रचंड नुकसान तर झालंच आहे. पण अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीच वाहून गेली आहे. शेतकऱ्यांचं हे नुकसान कधीही भरुन न येणारं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपतीही सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. (MP Sambhajiraje chatrapati visit to heavy rain affected area )

कर्नाटक सीमेलगत असलेल्या बोरसुरी गावात संभाजीराजे पोहोचले. त्यावेळी तेरणा नदीनं आपली वाट बदलली आणि संपूर्ण शिवार वाहून नेल्याचं त्यांना पाहायला मिळालं. संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ‘तेरणा नदीने आपली वाट बदलली आहे. कर्नाटक सीमेलगत बोरसुरी गावच्या शिवारातून जवळपास दीड-दोन किमी चालत जाऊन या केटी बंधाऱ्यावर आम्ही पोचलो.पलीकडे सोनखेड गावचे शेतकरी वाहून गेलेल्या शेताकडे बघत बसलेले दिसले. आम्हाला जवळ आलेले बघून त्यांनी आर्त हाक दिली आणि व्यथा मांडायला सुरुवात केली.’ असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

‘आमी आत्महत्या करायला तयार हाव…आवो काय, जगावं कसं बघा आम्ही ?”
…पलीकडं उभ्या असलेल्या शेतकरी कुटुंबाचे शब्द ऐकले, अन माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला की काय असं वाटून गेलं. काय बोलावं हेच क्षणभर सुचेनासे झाले.’ अशा शब्दात संभाजीराजे यांनी आपली भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.

मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते यांना भेटून तुमची व्यथा सांगू. तसंच लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत संभाजीराजे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसंच नदीकाठच्या किंवा ओढ्याच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे लवकर करुन घ्यावे. माती वााहून गेलेल्या किंवा नदीचे बदललेले पात्र यावर विशेष पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा सल्ला खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.

संबंधित बातम्या: 

…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार, संभाजीराजे कडाडले

सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी, मग आता मुख्यमंत्री का देत नाहीत?, संभाजीराजेंचा सवाल

MP Sambhajiraje chatrapati visit to heavy rain affected area