“आम्ही आत्महत्या करावी का?”, निलंग्यातील शेतकऱ्यांचा छत्रपती संभाजीराजेंना प्रश्न

| Updated on: Oct 19, 2020 | 6:07 PM

"आम्ही आत्महात्या करावी का?", असा प्रश्न निलंगा येथील शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीराजेंना केला.

आम्ही आत्महत्या करावी का?,  निलंग्यातील शेतकऱ्यांचा छत्रपती संभाजीराजेंना प्रश्न
Follow us on

लातूर : राज्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यादरम्यान खासदार संभाजीराजे यांनी लातूर जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. यावेळी “आम्ही आत्महात्या करावी का?”, असा प्रश्न निलंगा येथील शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीराजेंना केला (MP Sambhajiraje Review The Damage Caused By Rain).

“आमी आत्महत्या करायला तयार हाव… आवो काय, जगावं कसं बघा आम्ही?”, हे पलीकडे उभ्या असलेल्या शेतकरी कुटुंबाचे शब्द ऐकले, अन् माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला की काय असं वाटून गेलं. काय बोलावं हेच क्षणभर सुचेनासे झाले होते, अशी खंत या घटनेबाबत सांगताना संभाजीराजेंनी बोलून दाखवली.

“तेरणा नदीने आपली वाट बदलली आहे. कर्नाटक सीमेलगत असलेल्या बोरसुरी गावच्या शिवरातून जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालत जाऊन या केटी बंधाऱ्यावर आम्ही पोहोचलो. पलीकडे सोनखेड गावचे शेतकरी वाहून गेलेल्या शेताकडे बघत बसलेले दिसले. आम्हाला जवळ आलेले बघून त्यांनी आर्त हाक दिली आणि त्यांच्या व्यथा मांडल्या”, असं संभाजीराजेंनी सांगितली.

“होतं तेवढं सगळं शेत पाण्याबरोबर वाहून गेलं आहे. आम्ही त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला. आत्महत्या करु नका, मी राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना तुमची व्यथा सांगतो”, असा शब्द देऊन संभाजीराजेंनी शेतकऱ्यांना धीर दिला.

“माझी सरकारला विनंती आहे, की नदीच्या काठावरच्या किंवा ओढ्याच्या काठावरच्या शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे लवकर करुन घ्यावेत. माती वाहून गेलेल्या किंवा नदीचे बदललेले पात्र यावर विशेष पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे”, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली.

संभाजीराजेंनी आज मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी संभाजीराजेंकडे शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी शेती कर्ज प्रक्रियेत बॅंकांचे अधिकारी मुजोरपणाने वागतात, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. यावेळी संभाजीराजेंनी बांधावरुनच बॅंक अधिकाऱ्याला फोन केला आणि शेतकऱ्यांना सन्मानाने वागणूक देण्याच्या सूचना केल्या.

यावेळी छत्रपती संभाजीराजे शेतकरी आणि मीडियाशी बोलत असताना म्हटले, “कालपासून हा दौरा चालू आहे, मी ही परिस्थिती पाहून दुःखी आहे. सरकारने काहीतरी ठोस मदत द्यावी. शेतकऱ्यांनी जर आत्महत्या सारखे टोक्याचे पाऊल उचलल्यास याला राजकीय लोकप्रतिनिधी जबाबदार असतील. तात्काळ मदत करावी ही सरकारला मागणी केली आहे.”

MP Sambhajiraje Review The Damage Caused By Rain

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री आले आणि बघून गेले, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर राजू शेट्टींचं टीकास्त्र

नुकसान भरपाईचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; पंचनामे झाल्यानंतरच मदत मिळेल- मुख्यमंत्री

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला