तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील धर्माबादमध्ये ‘गावकऱ्यांचे किचन’, 21 हजार गरजूंना रोज घरपोच जेवण

| Updated on: Apr 27, 2020 | 10:23 AM

लॉकडाऊनच्या काळात धर्माबाद तालुक्यातील कुणीही उपाशी राहू नये यासाठी दररोज 25 हजार लोकांना पुरेल इतके जेवण बनवले जाते (Nanded Dharmabad Kitchen for Needy during Lockdown)

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील धर्माबादमध्ये गावकऱ्यांचे किचन, 21 हजार गरजूंना रोज घरपोच जेवण
Follow us on

नांदेड : तेलंगणा-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यात ‘आपल्या गावकऱ्यांचे किचन’ हा उपक्रम राबवला जात आहे. यातून दररोज तब्बल 21 हजार गरजू नागरिकांना जेवणाची पाकिटे घरपोच पुरवली जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात धर्माबाद तालुक्याला आपलं अन्नछत्र लाभलं आहे. (Nanded Dharmabad Kitchen for Needy during Lockdown)

तेलंगणा सीमेवरचा धर्माबाद तालुका विकासाच्या दृष्टीने अत्यंत मागासलेला आहे. या तालुक्यात मोलमजुरी करुन खाणारे जवळपास वीस हजार नागरिक राहतात. सध्या लॉकडाऊनमुळे या लोकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातून शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुबोध काकाणी यांनी ‘आपल्या गावकऱ्यांचे किचन’ हा उपक्रम सुरु केला.

सुरुवातीला काकाणी यांनी स्वतःच्या मित्रांच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची पाकिट पुरवली. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने गरजूंची संख्या वाढत गेली. त्यामुळे काकाणी यांनी शहरातील नागरिकांना श्रमदान करण्याची विनंती केली. काकाणी यांच्या आवाहनानंतर शेकडोंच्या संख्येने युवक, अधिकारी आणि कर्मचारी या किचनमध्ये श्रमदान करण्यास सरसावले.

आता इथे दररोज 25 हजार लोकांना पुरेल इतके जेवण बनवले जाते. लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील कुणीही उपाशी राहू नये यासाठी हा उपक्रम राबवल्या जात आहे. तसेच, तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांनाही हे जेवण पुरवण्यात येते.

जेवण तयार करण्यासाठी पहाटे दोन वाजल्यापासून गावकऱ्यांच्या किचनचे काम सुरु होते. अन्न शिजवून त्याची 21 हजार पाकिटे दररोज तयार केली जातात. त्यानंतर ही पाकिटे टेम्पोतून गावोगावी वाटप केली जात आहेत. या सर्व प्रक्रियेत स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते.

काकाणी स्वतः धान्याचा पुरवठा करतात, त्यातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. विशेष म्हणजे हा सगळा भाग तेलंगणा सीमेवरचा असल्याने तिथे तांदूळ हेच मुख्य अन्न आहे, त्याचीच काळजी घेऊन रोजच तांदळाचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. काकाणी परिवाराने पुढाकार घेत सुरु केलेला हा उपक्रम आता धर्माबाद तालुक्याचे किचन बनलं आहे.

लॉकडाऊन असेपर्यंत आपल्या गावकऱ्यांचे हे किचन सुरु ठेवणार असल्याचा निर्धार धर्माबादकरांनी केला आहे. अडचणीच्या काळात अख्खं शहर एकत्र आल्याने आपल्या गावकऱ्यांचे किचन हा उपक्रम यशस्वी ठरलाय. या उपक्रमाचे प्रशासनाने देखील कौतुक केलं आहे.