ऐतिहासिक नाशिकला स्मार्ट सिटीचा चूड; गोदाघाट उद्धवस्त करून मंदिरे तोडली, आंदोलन पेटणार!

| Updated on: Mar 07, 2022 | 10:23 AM

नाशिकला पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक असे अनन्य साधारण महत्त्व आहे. नाशिक हे श्रद्धेचे शहर असून, गंगाघाट परिसरात अनेक सुंदर मंदिरे आणि प्राचीन घाट आहेत. हे सुंदर मंदिरे व प्राचीन घाट बघण्यासाठी देश-विदेशातील भाविक व पर्यटक गंगाघाट परिसरात मोठ्या संख्येने येतात. मात्र, या सौंदर्याला नख लावण्याचे काम स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू आहे. त्याविरोधात नागरिक आक्रमक झालेत.

ऐतिहासिक नाशिकला स्मार्ट सिटीचा चूड; गोदाघाट उद्धवस्त करून मंदिरे तोडली, आंदोलन पेटणार!
नाशिकमध्ये स्मार्ट सिटीच्या नानाखाली गोदाघाट आणि अनेक मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. शेवटी नागरिकांनी हे काम बंद पाडले.
Follow us on

नाशिकः सरकारचे स्मार्ट सिटी (Smart City) अभियान म्हणजे नेमके काय, ऐतिहासिक वारशाला चूड लावण्याचे काम आहे का, असा संतप्त सवाल आता प्रत्येक नाशिककरांच्या (Nashik) मनात निर्माण होतोय. कारण एकीकडे रामसेतू पाडण्याच्या हालचाली स्मार्ट सिटी प्रशासनाने सुरू केल्या. तो वाद अजून शमतोय न शमतोय तोवर दुसरीकडे ऐतिहासिक गोदाघाटावर नांगर फिरवून प्रशासन मोकळे झाले आहे. येथील अनेक मंदिरे पाडली आहेत. त्यामुळे इथल्या सौंदर्याचा नाश झाला असून, आता याविरोधात नागरिकांनी कंबर कसलीच आहे. त्यांच्या सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेसही (NCP) मैदानात उतरलीय. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा नाशिकमध्ये आंदोलन पेटणार आहे.

नेमके प्रकरण काय?

स्मार्टसिटीची कामे करण्याच्या नावाखाली प्रशासनाने ऐतिहासिक रामसेतू पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचा दावाही केला होता. मात्र, स्मार्ट सिटीचे संचालक आणि काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे यांनी प्रशासनाचा हा दावा खोडून काढला. कसलेही ऑडिट झालेले नसताना प्रशासन खोटे बोलत आहे. याबाबत कंपनीचे अध्यक्ष आनंद लिमये यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर आता स्मार्ट सिटीच्या कामाचे कारण पुढे करत पौराणिक गोदाघाटाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यात अनेक मंदिरांचीही तोडफोड केली. त्यामुळे हे काम संतप्त नागरिकांनी थांबवले आहे.

अनन्य साधारण महत्त्व

नाशिकला पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक असे अनन्य साधारण महत्त्व आहे. नाशिक हे श्रद्धेचे शहर असून, गंगाघाट परिसरात अनेक सुंदर मंदिरे आणि प्राचीन घाट आहेत. हे सुंदर मंदिरे व प्राचीन घाट बघण्यासाठी देश-विदेशातील भाविक व पर्यटक गंगाघाट परिसरात मोठ्या संख्येने येतात. या मंदिरामुळे नाशिकचा उल्लेख काशी असाही केला होता. याच प्राचीन घाटांवर बारा वर्षांतून एकदा सिहंस्थ कुंभमेळा होतो. मात्र, हे सौंदर्य नष्ट करण्याचे प्रयत्न स्मार्ट सिटीच्या कामाखाली होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात संताप आहे.

नागरिक आक्रमक

नाशिकमध्ये स्मार्ट सिटी पौराणिक गोदाघाटाची तोडफोड करून वैभवाचा सत्यानाश करत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे पत्र शहराध्यक्ष अंबादास खैरे व अॅड. चिन्मय गाढे यांनी स्थानिक नागरिकांसमवेत गोदा प्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी, पुरोहित महासंघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पांडे यांना दिले.

अंधाधुंद कारभार

नाशिकमधील गंगाघाट परिसराला अनन्य साधारण महत्व असताना नाशिक स्मार्ट सिटीचा अंधाधुंद कारभार सुरू आहे. गोदावरी मातेचे रूपड बदलण्याऐवजी नको त्याठिकाणी नाक खुपसण्याचे काम स्मार्ट सिटी करत आहे. नदीपात्रातील सिमेंटचा भाग काढण्याऐवजी दगडी पाषाणाचे पौराणिक घाट व पुरातन मंदिर पाडून नाशिकचे वैभव घालण्याचे दुर्दैवी कारस्थान केले जात आहे. नाशिक स्मार्ट सिटीमार्फत केला जाणारा सत्यानाश कदापि सहन केला जाणार नाही. याविरोधात स्थानिक नागरिकांनी केलेल्या प्रत्येक आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष सदैव स्थानिक नागरिकांसोबत आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्याः

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे

Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?