पडक्या खोल्या, भिंतींना तडे, शाळेअभावी चार वर्षांपासून विद्यार्थ्यांवर मंदिरात शिक्षण घेण्याची वेळ

देशात प्रत्येक मुलाला शिक्षा मिळावी यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहेत. मात्र, दुसरीकडे शाळेअभावी गेल्या चार वर्षांपासून मंदिरात शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ नांदगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांवर आली आहे.

पडक्या खोल्या, भिंतींना तडे, शाळेअभावी चार वर्षांपासून विद्यार्थ्यांवर मंदिरात शिक्षण घेण्याची वेळ
Nupur Chilkulwar | Updated on: Jan 16, 2020 | 2:26 PM

नाशिक : देशात प्रत्येक मुलाला शिक्षा मिळावी यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहेत (Right To Education). मात्र, दुसरीकडे शाळेअभावी गेल्या चार वर्षांपासून मंदिरात शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ नांदगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांवर आली आहे. नांदगाव तालुक्यातील तांबेवाडी या गावातील 103 विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून मंदिरात शिक्षण घेत आहेत.

तांबेवाडीतील शाळेच्या सर्व खोल्या धोकादायक झाल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून पहिली ते चौथीपर्यंतचे 103 विद्यार्थी हे विठ्ठल रुक्मिणी व समाज मंदिरात शिक्षण घेत आहेत. शाळेच्या खोल्या पडक्या झाल्या आहेत, भिंतीला तडे गेले आहेत, खोलींचे स्लॅब कोसळले आहेत. त्यामुळे या खोल्यांमध्ये बसताना विद्यार्थ्यांना भीती वाटते.

शाळेच्या खोल्यांची दुरवस्था झाल्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष चार वर्षांपासून शिक्षण विभाग आणि पंचायत समितीच्या कार्यलयाचे खेट्या घालत आहेत. मात्र, त्यांना उडवा-उडवीचे उत्तर दिले जात आहे. शाळेसाठी नवीन खोल्या बांधण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून निधी मिळताच नवीन खोल्या बांधण्यात येणार असल्याचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी ठोके यांनी सांगितल.

एकिकडे शहरापासून खेड्या-पाड्याप्रयत्न कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. दुसरीकडे, शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. तांबेवाडीप्रमाणे इतर अनेक ठिकाणी अशीच अवस्था आहे. कुठे शाळा आहे, तर शिक्षक नाही आणि शिक्षक आहे तर शाळा नाही. राज्याला साक्षर करायचे असेल तर शिक्षण विभागाने आपली जबाबदारी चोखपणे बजावणे गरजेचे आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

Students Taking Education In Temple

Follow Us